मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात अनेक अनेक जिल्ह्यांमधील पॉझिटिव्ही रेट आणि रुग्णसंख्या वाढत आहे. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं. आज मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सहा जिल्ह्यांना अलर्ट केलं आहे. या जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या अद्यापही कमी झालेली नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना थेट इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या जिल्ह्यांमध्ये पूर येऊन गेला, तिथे कोरोनाचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. पूर येण्यापूर्वीदेखील प्रामुख्याने या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. सध्यादेखील या जिल्ह्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कोव्हिड-१९ बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वात जास्त काळजी घ्यायला हवी. येथील जनतेने बेसावध राहून चालणार नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पूरग्रस्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांसह पुणे सोलापूर, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांनादेखील कोरोनाचा धोका आहे. या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची दररोज नोंद होत आहे. येथील शहरं आणि ग्रामीण भागातील परिस्थितीत तफावत असू शकते. परंतु या जिल्ह्यांच्या प्रशासनाने आणि नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी, कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी आपण ‘कोरोनामुक्त गाव’ यासारखे उपक्रम राबवतोय. मी, तसेच प्रशासन गावांमधील सरपंचांशी संपर्क करत आहोत. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे अनेक गावं कोरोनामुक्त झाली आहेत. अशाच पद्धतीने आपण कोरोनाला हद्दपार करण्यात यशस्वी होवू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.