जळगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेल्या अनेक वर्षापासून काही बेकायदेशीर नियुक्ती व करारनामे झालेली आहेत. या बेकायदेशीर नियुक्तीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव अँड. कुणाल पवार यांनी प्रभारी कुलगुरू यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठात गेल्या अनेक वर्षापासून काही बेकायदेशीर नियुक्ती व करारनामे झालेली आहेत. १) विद्यापीठात परीक्षा विभागाच्या गोपनीय कामकाजासाठी अनेक वर्षापासून Ordinance No १५१ च्या ७ कलमानुसार कुलगुरूंना विशेष अधिकार वापरून परीक्षा विभागाचे गोपनीय कामकाज करण्याचे अधिकार आहेत परंतु मनमानीपणे पैसे उधळण्याचा अधिकार नाही. कोरोना काळात परीक्षा ऑनलाईन घेण्याचे ठरले असल्यामुळे परीक्षा कामासाठी नवीन प्रक्रिया राबविली गेली होती का? नवीन करारनामा किती वर्षासाठी केला गेला त्यामुळे विद्यापीठाचे पैसे वाचले का? इतर विद्यापीठाप्रमाणे टेंडर प्रक्रिया राबवून पारदर्शक काम झाले का? असे अनेक प्रश्न आमच्या मनात उपस्थित झाले आहेत. आम्ही या संदर्भात वेळोवेळी केलेल्या तक्रारींचे निरसन करावे.
२) विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी पदी नियुक्ती करतांना विद्यापीठ कायदा २०१६ नुसार कलम १४(५) नुसार प्रभारी वित्त व लेखाधिकारी प्रा. डॉ. मधुलिका सोनवणे यांची नियुक्ती झाल्याची त्यांना दिलेल्या आपल्या अधिकाराने ऑर्डर देण्यात आली आहे परंतु कलम १४(५) हा फक्त कुलसचिव पदासाठी वापरण्याचे असल्यामुळे सदरील नियुक्ती बेकायदेशीर कलमानुसार आढळून येते. प्रभारी संवैधानिक पदासाठी तात्पुरता कार्यभार (वित्त व लेखाधिकारी) नियुक्ती प्रक्रिया राबवितांना महाराष्ट्र शासनाच्या १५ मार्च २०१३ च्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे व दि.०५ सप्टेंबर २०१८ च्या सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णयाचे पालन केले गेले नाही म्हणून काही विशिष्ट हेतू ठेवून त्यांची नियुक्ती केली आहे का? असा संशय निर्माण होतो. वरील मागण्यांचा व झालेल्या बेकायदेशीर नियुक्ती बाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे यात म्हटले आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव अँड. कुणाल पवार, भूषण भदाणे, अतुल कदमबांडे, शिवराम पाटील, रोहन सोनवणे, अनिकेत पाटील, विजय पाटील, विजय लाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.