मुबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ७ डिसेंबरपासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये घेतला आहे.
हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आयोजित करण्यात येते; पण सध्या जगावर, देशात आणि राज्यावर असलेले कोरोनाचे संकट आणि राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता नागपूर ऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ७ डिसेंबरला अधिवेशन घेता येईल का आणि किती दिवस घ्यायचे याबाबतही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला. अनेक विधिमंडळ सदस्यांनी नागपूर येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन घेणे उचित होणार नाही अशा सूचना या वेळी केल्या आहेत. बैठकीला विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस (व्हीसीद्वारे) आदी मान्यवर हजर होते.
















