जळगाव (प्रतिनिधी) पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमित शहा यांनी गिरीश महाजन यांचे कौतुक केले होते. त्यांचा जर केंद्रात यामुळे प्रभाव पडला असेल तर गिरीश महाजन यांनी केंद्राकडून जळगाव जिल्हा आणि राज्यासाठी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा. असे झाले तर त्यांचा जाहीर चौकात सत्कार करेल, अशी ग्वाही देत असल्याचा चिमटा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन याना काढला आहे.
राज्यात सुरू असलेला लसीकरणाचा कार्यक्रम आणि उपलब्ध होणारा लसीचा साठा या मुद्द्यावरूनदेखील गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. “राज्य सरकार पूर्ण लसी घ्यायला तयार असेल, तर लस देण्याचा अधिकार कुणाला आहे हे मी सांगण्यापेक्षा गिरीशभाऊंना चांगलं माहिती आहे. राजकारण कोण करतंय हे गिरीशभाऊंना माहिती आहे. लसी पूर्ण उपलब्ध असल्या, तर महाराष्ट्र सरकारची आरोग्य यंत्रणा एवढी सज्ज आहे की दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण राज्याला लसीकरण करू शकते. जोपर्यंत लसीकरणाचा कोटा आपल्याकडे येत नाही, तोपर्यंत इथे परमेश्वर जरी आला, तरी लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही”, असं ते म्हणाले.














