नागपूर (वृत्तसंस्था) छापा टाकायचा आणि काटा काढायचा ही तुमची थेरं फार दिवस चालणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात म्हणाले. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, तर काटा काढून मग छापा टाकतो, असं आठवले म्हणाले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी आठवले नागपुरात आलेले आहेत. दरम्यान आज दुपारी रवी भवन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त विधान केले. ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून छापा टाकून काटा काढण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने करण्यात येतो. पण आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, तर काटा काढून मग छापा टाकतो, असे रामदास आठवले म्हणाले.
ते पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशमधील निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात आहेत. तेथे स्वबळावर लढून आम्हाला यश येणार नाही. आम्ही केंद्र सरकारचा एक घटक पक्ष आहो. त्यामुळे भाजपसोबतच तेथे लढण्याचा आमचा विचार आहे. शक्तिपरीक्षणासाठी तेथे रॅली काढणार आहोत. त्यानंतर लढण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
एकटे निवडणूक लढल्यास पराभव होण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे पडण्यासाठी उभे राहण्यापेक्षा निवडून येण्यासाठी कशा पद्धतीने उभे राहता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप आरपीआयला त्या निवडणुकीत सोबत घेईल, याची शक्यता वाटत आहे. त्यामुळे भाजपच्या साथीने आम्ही उत्तर प्रदेशात यश मिळवू. भाजपला आमचा फायदाच होणार आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेस आणि कम्युनिस्टांना फारशी मते मिळाली नाही आणि भाजपच्या ९५ जागा या फक्त ५०० ते १५०० मतांच्या फरकाने हरलेल्या आहेत. हा फरक जर भरून काढता आला असता, तर भाजपला १८० ते १९० जागांवर विजय मिळाला असता, असे आठवले म्हणाले.