नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाकिस्तानातून होणारी घुसखोरी थांबली नाही आणि काश्मीरमध्ये अशाच प्रकारे सामान्य नागरिकांवर हल्ले होत राहले तर पुन्हा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करायला वेळ लागणार नाही असा इशारा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला दिला आहे.
गोव्याच्या धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात अमित शाह बोलत होते. “पीएम मोदी आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राईक हे एक महत्त्वाचे पाऊल होते. भारताच्या सीमांवरील शांतता कोणीही भंग करू शकत नाही, हाच संदेश आम्ही या या सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून दिला होता. दोन्ही देशादरम्यान चर्चेची एक वेळ होती, मात्र आता ती वेळ राहिली नसून आता जशात तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे,” असेही गृहमंत्री शाह म्हणाले.
भारतातील उरी, पठाणकोट आणि गुरदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने सप्टेंबर २०१६ मध्ये पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या.