मुंबई (वृत्तसंस्था) मी नक्कीच स्वतः ७ वेळा निवडून येईन याची मला खात्री आहे. पण स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत?, असा सवाल भाजपचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी एकनाथराव खडसेंना विचारला आहे.
भाजपचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्यात मागील काही दिवसापासून कलगीतुरा रंगलेला आहे. प्रसाद लाड यांनी आज पुन्हा खडसेंवर सडकून टीका केलीय. अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पदे उपभोगली तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत,असे प्रत्युत्तर प्रसाद लाड यांनी दिले.यावेळी त्यांनी खडसेंनी दिलेली आव्हान देखील स्वीकारले आहे. भाजपने माझ्या मुलीला निवडणुकीत हरवले,असा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता. यावर प्रसाद लाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. आजवरच्या राजकारणात भाजप संघटन आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत.तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्ष त्याग केला.ज्या पक्षाने एवढं दिलं. अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली, तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत”, अशी टीका त्यांनी केली. “स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत? मी नक्कीच स्वतः ७ वेळा निवडून येईन याची मला खात्री आहे!”, असे म्हणत त्यांनी खडसेंचे आव्हानच एकप्रकारे स्वीकारले आहे. दरम्यान, प्रसाद लाड यांनी किमान एकदा तरी जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते.