नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. दुसरी लाट ओसरली तरी तिसरी लाटेची टकटक सुरु झाली आहे. रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी म्हटले आहे.
भारतात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल म्हणाले की, मास्क परिधान करणे आता बंद होणार नाही. पुढील काही काळासाठी किंवा पुढच्या वर्षांपर्यंत सुद्धा आपल्याला मास्क घालावे लागतील. कारण कोरोना विरूद्ध लढा केवळ शिस्त, लस आणि प्रभावी औषधांद्वारे जिंकला जाऊ शकतो. मला विश्वास आहे की या साथीच्या वेळी आपण त्यावर मात करू.
तिसऱ्या लाटेच्या शक्यतेबद्दल विचारले असता, डॉ. पॉल म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट नाकारता येत नाही. पुढील तीन-चार महिने खूप महत्वाचे आहेत. आम्हाला स्वतःचे संरक्षण करणे आणि उद्रेक टाळणे आवश्यक आहे. आगामी सणासुदीच्या काळात सुरक्षा कमी करण्याबाबत सावध केले. असे केल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरू शकतो.