मुंबई (वृत्तसंस्था) रायगडमधील खोपोलीजवळील साजगाव येथील आर्कोस औद्योगिक नगरीतील रासायनिक उत्पादन करण्याऱ्या लघू उद्योग जसनोवा केमिकल फॅक्टरीस भीषण स्फोट झाला, त्यात २ जण ठार झाले आहेत, तर ६ जण जखमी आहेत. राज्यात दिवसेंदिवस होणाऱ्या स्फोटांवरच सामनाच्या अग्रलेखात बोट ठेवण्यात आलं आहे. अशी भूमिका शिवसेनेनं व्यक्त केली आहे.
कुठल्याही राज्याच्या प्रगतीसाठी औद्योगिक भरभराट ही आवश्यकच आहे. रोजगाराबरोबरच राज्याच्या वैभवातही ते भर घालत असतात. खासकरून महाराष्ट्र या औद्योगिक घोडदौडीमध्ये सदैव अग्रेसर असतो. मात्र या प्रगतीबरोबरच औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन करणेही तितकेच आवश्यक आहे. खोपोली आणि पालघरमधील कारखान्यांमध्ये झालेल्या दुर्घटनांनी सुरक्षेचा विषय किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा समोर आले आहे. सरकार आपल्यापरीने या संदर्भात नियम, कायदे करीतच असते. त्याचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी सगळय़ांचीच आहे. ज्या आधुनिक युगात आपण वावरतो आहोत तिथे अशा दुर्घटनांना थारा असूच शकत नाही. मोठ्या प्राणहानीपूर्वी स्फोटांची ही मालिका थांबवावीच लागणार आह. कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोटाने गुरुवारी महाराष्ट्रातील रायगड आणि पालघर हे दोन जिल्हे हादरले. कंपन्यांमध्ये होणारे स्फोट ही दोन्ही जिल्ह्यांसाठी नवीन बाब नसली तरी नेहमीच होणाऱया या धमाक्यांकडे दुर्लक्ष तरी किती आणि का करायचे? उद्योगधंदे करणाऱ्या मंडळींना कुठल्याच बाबतीत इन्स्पेक्टर राज नको असते. काही बाबतीत ही दंडुकेशाही कारखानदारी आणि उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी मारक ठरते हे खरे असले तरी सरसकट मोकळीक देणेही अनेकदा घातक ठरू शकते. सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दुर्घटनांना आमंत्रण मिळते व त्यातून कामगारांच्या जिवाशी खेळ होतो. कधी कारखान्यांतून विषारी वायुगळतीच, कधी आगीच्या घटना घडतात, आसपासचा परिसर हादरवून सोडणारे भयंकर स्फोट! एप्रिल महिन्यातही तारापूरमध्येच एका कंपनीत हायड्रोजन पॅरॉक्साईडच्या टाकीत स्फोट होऊन तीन जण मृत्युमुखी पडले. तारापूर आणि पालघरमध्ये तर सतत धमाक्यांची साखळी सुरू असते. स्फोटांची शहरे हीच आता त्यांची ओळख बनली आहे.