वरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या सुसरी ता. भुसावळ शिवारातील गट नं. २००-१ या साडेचार एकर शेतातील तीनशे केळीचे घड कापून फेकली व जलवाहिनी फोडून प्रचंड नुकसान करण्यात आले आहे . तसेच ग्रामपंचायतीच्या विहीरीवरील केबल वायर चोरीला गेल्यामुळे शेतकरी चांगलेच त्रस्त झाले आहेत .
सुसरी शिवारात चंद्रशेखर झोपे यांचे शेत आहे. त्यांच्या साडेचार एकर शेतात सात हजार केळीची झाडे लावलेली आहेत. मंगळवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत अज्ञात व्यक्तीने तीनशे च्या आसपास केळीचे घड कापून फेकले त्यामुळे त्यांचे एक लाखापेक्षा जास्त नुकसान केले आहे. तसेच शेतातील पाणीपुरवठा करणारी जलवाहीनी देखील तोडून फेकली आहे. त्यामुळे शेतातील पाणीपुरवठा देखील करता आला नाही. दुसऱ्या घटनेत सुसरी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहीरीवरील विजपुरवठा करणाऱ्या केबल देखील चोरी झाल्या आहेत. या परिसरात शेतकऱ्यांना केबल, मोटारी, पाण्याचे स्प्रींकलर, मोटार सुरू करण्याचे स्टार्टर यासह इतर साहित्याची नेहमीच चोरी होत असते. शेतकरी हवालदिल झाले आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीसात अज्ञान आरोपी विरूध्द गुन्हा दाखल असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिपकुमार बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर पाटील करीत आहे.