मिरज (वृत्तसंस्था) शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा तुटून पडलेल्या वीजवाहक तारेचा तीव्र धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी म्हैसाळ (ता. मिरज, जि. सांगली) येथे ही घटना घडली. या दुर्घटनेत अन्य एक मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. वडील व लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
म्हैसाळमधील सुतारकी मळा भागातील वनमोरे मळ्यातील हे सर्व रहिवासी आहेत. पारिसनाथ मारुती वनमोरे (४०) त्यांचा मुलगा साईराज (१२) व पारिसनाथ यांचे चुलत भाऊ प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (३५) या तिघांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला, तर पारिसनाथ यांचा दुसरा मुलगा हेमंत (१५) याला ही विजेचा तीव्र धक्का बसला आहे.
पारिसनाथ आणि त्यांची दोन्ही मुले हेमंत आणि साईराज हे तिघे शेतात वैरण काढण्यासाठी जात होते. वडील पारिसनाथ आणि मोठा मुलगा हेमंत हे पुढे गेले तर साईराज हा त्यांच्या मागे थोड्या अंतरावर होता. पाऊस झाल्याने पाणी व चिखलसदृश स्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी विद्युत तार तुटून पडल्याचे या तिघांनाही समजले नाही. पारिसनाथ यांना सर्वप्रथम विजेचा धक्का बसला, तर हेमंत यालाही विजेचा धक्का बसल्याने तो बाजूला फेकला गेला. पारिसनाथ हे त्याच ठिकाणी कोसळले.
याचवेळी पारिसनाथ यांचा दुसरा मुलगा साईराज हा तेथे आला असता, त्याला ही विजेचा धक्का बसला. भाऊ आणि दोघा पुतण्यांना विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच प्रदीप वनमोरे हे धावत वीज प्रवाह बंद करण्यासाठी गेले. मात्र, दुर्दैवाने पारिसनाथ यांना विजेचा धक्का बसला होता, त्यापासून थोड्या अंतरावर प्रदीप यांनाही विजेचा धक्का बसला. तेही त्या ठिकाणी कोसळले. या दुर्दैवी घटनेत पारिसनाथ, साईराज व प्रदीप वनमोरे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर हेमंत हा विजेच्या धक्क्याने बाजूला फेकला गेला.
दरम्यान, मृत तिघांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून देण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जाहीर केले. जखमी हेमंत वनमोरे या मुलाच्या उपचारासाठी लागणारा सर्व खर्च देण्याची घोषणा मंत्री डॉ. खाडे यांनी केली. तसेच या प्रकरणातील दोषींवर सखोल चौकशी करून कडक कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत.