नाशिक (वृत्तसंस्था) ‘वाघाशी कधी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची’, असा पलटवार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यावर केला.
वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिलं. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर परखड मत व्यक्त केले. ‘राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहे. ठीक आहे ते आमच्यावर टीका करता, आम्ही त्यांच्यावर टीका करतो. पण, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घ्याव्यात, त्यांना गोडधोड खाऊ घालावे, केक कापावे, ते गोड माणूस आहे, अशी कोपरखळी राऊत यांनी लगावली.
नरेंद्र मोदी हे भाजपा आणि देशाचे मोठे नेते आहेत. जे यश भाजपला प्राप्त झालं आहे ते त्यांच्या चेहऱ्यामुळेच आहे. पण पंतप्रधान हे देशाचे असतात, त्यांनी राजकीय प्रचार करु नये. कोणत्याही पक्षाचा प्रचार करु नये. ते देशाचे पंतप्रधान आहेत. फोटो वापरणे हे कार्यकर्त्यांवर असतं. बाळासाहेबांचा फोटो वापरला जातो, वाजपेयींचा वापरा जात होता. हे असं ठरवून होत नाही, लोकांच्या मनात तो नेता असतो, असं संजय राऊत म्हणाले.
मालाड इमारत दुर्घटना दुर्दैवी आहे. टीका करणाऱ्यांना करु द्या, स्वत: मुख्यमंत्री काल रस्त्यावर उतरले. सगळेच काल रस्त्यावर उतरले होते. टीका करणाऱ्यांना काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते ?
“वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच”, असं चंद्रकांत पाटील काल पुण्यात म्हणाले होते.