चंद्रपूर (वृत्तसंस्था) अंगावर धावून आलेल्या वाघाला केवळ साध्या छत्रीच्या साहाय्याने पळवून लावत स्वतःचा व आपल्या दोन बैलांचा जीव शेतकऱ्याने वाचविल्याची धक्कादायक घटना वरोरा तालुक्यात घडली आहे. शेतकरी महेंद्र गारघाटे यांनी आपल्या दोन बैलांना वाचवण्यासाठी चक्क वाघासमोर उभे राहिल्याने त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बैल चरावयास सोडले !
वरोरा तालुक्यातील कोडबाळा येथील शेतकरी महेंद्र गारघाटे गुरुवारी सकाळी ११ वाजता आपल्या दोन बैलांना घेऊन शेतामध्ये गेले होते. गारघाटे यांच्या शेताला लागूनच महसूल विभागाचे झुडपी जंगल आहे. महेंद्र गारघाटे यांनी याच भागात आपले बैल चरावयास सोडले. मात्र आपल्यापासून चाळीस फूट अंतरावरच पट्टेदार वाघ बसून आहे, याची त्यांना कल्पनाही आली नाही.
बैलांसमोर पट्टेदार वाघ होता उभा !
गारघाटे हे थोड्या वेळाने बैल तिथेच चरायला सोडून लागून असलेल्या शेताकडे गेले. तेवढ्यात त्यांना तिथे शेळया राखणाऱ्या एका मुलाने फोन करून तुमच्या बैलांजवळ वाघ असल्याची माहिती दिली. महेंद्र गारघाटे क्षणाचाही विलंब न करता बैलाजवळ गेले. यावेळी त्यांना आपल्या बैलांसमोर पट्टेदार वाघ उभा असल्याचे दिसले.
पट्टेदार वाघाने बैल सोडून आपला मोर्चा शेतकऱ्याकडे वळवला !
गारघाटे हे घटनास्थळी पोहोचताच पट्टेदार वाघाने बैल सोडून आपला मोर्चा महेंद्र गारघाटे यांच्याकडे वळविला. मात्र महेंद्र यांनी न घाबरता आपल्याजवळील छत्रीला उभारून बंद केली. त्यामुळे वाघ मागे फिरला. गारघाटे यांनी आरडाओरडा केल्यानंतर वाघाने जंगलाकडे धूम ठोकली. स्वतःजवळ असलेल्या साध्या छत्रीच्या व हिमतीच्या बळावर महेंद्र गारघाटे यांनी वाघाच्या तावडीतून स्वतःचा व आपल्या दोन्ही बैलाचा जीव वाचविला. त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.