धरणगाव (प्रतिनिधी) येथील वादग्रस्त तहसीलदार नितीन देवरे यांची अखेर बदली झाली आहे. तलाठ्यांचे काम बंद आंदोलन, पत्रकाराला नोटीस, पाळधी गौण खनिज प्रकरण, पिंपळे शिवारातील ७० हेक्टर सुपीक जमीनीवर स्टोन क्रेशर परवानगी अशा अनेक विषयात ते वादग्रस्त ठरलेले होते. तहसीलदार नितीन देवरे यांची मालेगाव ता. जि. नाशिक येथे बदली झाल्याचे आदेश सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. दुसरीकडे तहसीलदार यांची बदली झाल्याचे वृत्त आनंददायी असल्याची प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र महाजन यांनी दिली आहे.
सदरील आदेशात संबंधित अधिकारी यांना बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करीत असलेल्या पदावरुन देशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यांनी त्यांच्या पदस्थापनेच्या पदावर दि. १३ मार्च २०२३ जी (म.पू.) रुजू होणे अनिवार्य आहे. सदर आदेशाद्वारे रुपेशकुमार सुराणा, श्री. चंद्रजित राजपूत, कैलास चावडे (पाचोरा) (सर्व तहसिलदार) यांना त्यांच्या सद्याच्या पदावरुन एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असून त्यांच्या स्थापनेबाबतचे आदेश यथावकाश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील, असे म्हटले आहे. सोशल मीडियातील आदेशावर शासनाचे सह सचिव डॉ. माधव वीर यांची स्वाक्षरी असल्याचे दिसत आहे.
धरणगावचे तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या कामाबद्दल काही तलाठी यांनी नाराजी व्यक्त करत २०२१ मध्ये कामबंद आंदोलन केले होते. हा वाद अनेक दिवस रंगला असल्याचे माध्यमात छापून आले होते. दुसरीकडे गेल्यावर्षी पाळधी बुद्रुक, ता. धरणगाव येथील अवैधरीत्या उचल केलेल्या १९ हजार ब्रास मुरुमासंदर्भात १८ कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. याप्रकरणी संबंधित कंपनीने न्यायालयात दाद मागितली आणि फेरचौकशीची मागणी केली. न्यायालयाने दिलासा दिल्यावर धरणगाव तहसीलदारांनी तक्रारदाराविना पंचनामा केल्याने नवा वाद उभा राहिला होता. आर्थिक फायद्यासाठीच जिल्हा प्रशासनाने सोयीने एकतर्फी फेरचौकशी सुरू केल्याचा आरोप तक्रारदार दीपककुमार गुप्ता यांनी केला होता.
एका स्टोन क्रेशरच्या व्यवसायासाठी पिंपळे शिवारातील ७० हेक्टर सुपीक जमीन नापीक होऊ देऊ नका, अशी आर्तहाकच शेतकऱ्यांनी दिली होती. संबंधित व्यवसायिकाने नियमांची पायमल्ली केली असून धरणगाव तहसीलदारांनी याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलेय. कारण त्यांनी संबंधिताकडून चिरीमिरी घेतली असल्याचा गंभीर आरोप देखील शेतकऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कुटुंबासह सामुहिक आत्महत्येची परवानगी देण्याची मागणी करत केल्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती.
तर कॉंग्रेसचे कार्यकर्ते रामचंद्र माळी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार करत तहसीलदार देवरे हे वारंवार माळी समाजातील लोकांना टार्गेट करत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर देवरे यांची पुढील काही दिवसात बदली होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती.
तहसीलदार बदली झाल्याचे वृत्त आनंददायी असल्याची प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र महाजन यांनी दिली आहे. दरम्यान, आगामी येवू घातलेल्या निवडणुका निर्भय, नि:पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी जितेंद्र महाजन यांनी याआधीच निवडणूक आयोगाकडे मे २०२२ मध्ये केली होती.