भुसावळ (प्रतिनिधी) तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. दानिश शेख जाबीर शेख (१७) आणि अंकुश दौलतसिंग ठाकूर (१७, रा. ३२ खोली, खडका रोड, भुसावळ) अशी मयत बालकांची नावे आहेत.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील ३२ खोली भागातील रहिवासी असलेले युवक अंकुश ठाकूर व दानिश शेख यांच्यासह ५ जण तापी नदीवर रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पोहोण्यासाठी गेले होते. पोहताना पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने अंकुश आणि दानिश हे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आला. त्यांनी मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. दोघांना बाहेर काढण्यासाठी मासेमारी करणाऱ्या युवकांची मदत घेण्यात आली. पोहणाऱ्या युवकांना तीन जणांना वाचवण्यात यश आले. तर बेशुद्ध अवस्थेतील दोन्ही युवकांना एका रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी दोन्ही युवकांना मृत घोषित केले. हॉस्पिटलमध्ये नातेवाइकांनी गर्दी केली होती. दरम्यान, दोन्ही मुलांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला.