जळगाव (प्रतिनिधी) गावातील लग्नात येणाऱ्या प्रवासी रिक्षाला धडक दिल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी अवैध वाळू वाहतूक करणारी दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. ही थरारक घटना तालुक्यातील आव्हाणे गावात घडली आहे.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. राहूल बारेला (रा. मध्यप्रदेश ह.मु. आव्हाणे ता.जि.जळगाव) याच्या मालकीचे दोन ट्रॅक्टर वाळू भरून मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आव्हाणे गावातील मरीमाता मंदिराकडून येत होता. यातील एका ट्रॅक्टरने जळगावकडून येणाऱ्या (एम.एच.१९,१४१३) रिक्षाला उडविले. त्यात तीन प्रवाशी महिलांसोबत रिक्षा चालक जखमी झाला. या घटनेमुळे ग्रामस्थ प्रचंड संतापले. ग्रामस्थांनी थेट वाळूने भरलेले दोघं ट्रॅक्टर पेटवून दिले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच आव्हाने गावात जळगाव तालुका पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.