मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रोची कारशेड कांजूरला हलवून पर्यावरणाचे रक्षण केले आहे. ते एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील इतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले.
पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथील सरकारी जमिनीवर उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या भूमिकेला विरोधी पक्षानं विरोध केला आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनीही हा निर्णय दुर्देवी असून अहंकारातून घेतला असल्याची टीका राज्य सरकारवर केली होती. यावरूनच संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना पंतप्रधान मोदींच्या पर्यावरण संवर्धनाच्या प्रकल्पांची आठवण करून देत निशाणा साधला आहे. ‘पंतप्रधान मोदी नेहमी पर्यावरण रक्षणाबाबत बोलत असतात. त्यांच्या कार्यकाळात गंगा शुद्धीकरण, वाघ वाचवा, जंगल वाचवा, या सारखे उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी आरेतील जंगलाचे क्षेत्र ६०० एकरावरुन ८०० एकरापर्यंत वाढवले त्यामुळं भाजप नेत्यांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.