मुंबई (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन विरोधकांकडून ठाकरे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याप्रकरणावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची हिंमत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कधीही आपल्या भाषणात ‘मी मर्द आहे‘ असा उल्लेख करु नये, अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली.
संजय राठोड यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप विरोधक वारंवार करत असतानाच पोहरादेवी गर्दी जमवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. बुधवारी संजय राठोड यांनी मुंबईत येत मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. यामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी केली आहे. तर भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निशाण साधला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले आहेत की, “ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवतय. सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तिप्रदर्शन करतो, कॅबिनेट मीटिंगमध्ये बसतो पण तरीही त्याचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही”. “परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे‘,” असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ या वानवडी पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या, पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक बघून आश्चर्य वाटले, एक गुन्हेगार मंत्र्याला वाचवण्यासाठी पोलीस किती तत्पर आहेत. यावरून लक्षात आलं अशा शब्दात निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.