मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात सुरु असलेल्या “ब्रेक द चेन” या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले होते. त्यानुसार राज्यात सुरु असलेल्या शिवभोजन थाळीची मुदत एक महिन्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या १४ जूनपर्यंत नागरिकांना मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन सादर केलेल्या याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय दि. १४ मे रोजीच निर्गमित केला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन संख्येतही दीडपट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब आणि गरजूंना मोठा आधार मिळाला आहे.
४८ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला नि:शुल्क भोजनाचा लाभ
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. या काळात राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत, याची काळजी शासनाने घेतली आहे. राज्यात दिनांक १५ एप्रिल २०२१ पासून शिवभोजन योजनेअंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे.
यानुसार १५ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ पर्यंत ४८ लाख ४४ हजार ७०९ नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.
शिवभोजन थाळीची योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६ थाळ्यांचे राज्यभरात वितरण करण्यात आले आहे. तर संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण ९५० केंद्र सुरु आहेत.