लखीमपूर खेरी (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांना साधारण वर्षभराचा काळ राहिलेला असतानाच योगी सरकारचा घामटा फुटेल अशी घटना लखीमपूरमध्ये घडलीय. कारण केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर थेट गाडी घातल्याचा आरोप करण्यात येतोय. या घटनेदरम्यान, आठ शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तर, अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे आज लखीमपूर येथे आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा अभिषेक आणि आंदोलन शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर मोटार घातल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.
यूपीतील लखीमपूर खेरी येथे एका कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आले होते. मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा दुपारी तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले, ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात चार शेतकरी आणि चार भाजपचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर मौर्य यांनी भवानीपूर गावातील आपला दौरा रद्द केला आहे.