चाळीसगाव (प्रतिनिधी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा देशाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने नेणारा असल्याचे प्रतिपादन आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली भारत सर्वच क्षेत्रात भक्कमपणे पुढे जात असल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले.
या अर्थसंकल्पात शेतकरी, युवा, महिला, मध्यमवर्ग, उद्योग आणि पायाभूत सुविधा यांच्यावर विशेष भर देण्यात आला असून, तो निश्चितच लोकाभिमुख आणि विकासाभिमुख असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना अधिक बळ देण्यात आले आहे.
कृषी क्षेत्रासाठी वाढीव तरतूद, आधुनिक शेती पद्धती, सिंचन व्यवस्था, साठवणूक सुविधा तसेच शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडणाऱ्या योजनांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, ऊर्जा आणि औद्योगिक विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदी देशाच्या वेगवान प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि स्टार्टअप्ससाठी घेतलेले निर्णय युवकांसाठी नव्या संधी निर्माण करणारे असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या असल्याचे आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.
एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे ‘विकसित भारत’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा, सामान्य नागरिक, शेतकरी आणि देशाच्या भविष्यासाठी आशादायी असा असल्याचे सांगून आमदार मंगेश चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्र सरकारचे मनापासून अभिनंदन केले.
















