मुंबई (वृत्तसंस्था) १४ लाख लसी उपलब्ध आहेत. हा तीन दिवसांचा स्टॉक आहे. तीन दिवसांनी लसीकरण ठप्प होईल. दर आठवड्याला ४० लाख लसीचा पुरवठा केला पाहिजे. केंद्र लस पाठवतात पण गती कमी आहे. जसं सांगितलं जातंय तसा पुरवठा होत नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच आपण लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावं अशाही शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी काल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीसंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलताना म्हणाले की, “काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. केंद्राच्या जेवढ्या टीम आजपर्यंत आल्या, त्यांचे नियम आणि आयसीएमआरच्या गाईडलाईनचं तंतोतंत पालन महाराष्ट्रानं आजवर केलं आहे. अनेकांचा विरोध घेऊन कठोर निर्णय महाराष्ट्रानं घेतले आहेत. राज्यानं केंद्राच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. प्रकाश जावडेकरांनी ट्वीट करुन सांगितलं की, ६ लाख लसीकरण करा, डोस केंद्राकडून पुरवले जातील. राज्यात सध्या दररोज साडेचार लाख लोकांचं लसीकरण केलं जातंय. मात्र, लस नाही म्हणून अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. लसीकरणासाठी आलेल्या लोकांना घरी पाठवावं लागतंय. आमची आधीपासून हिच मागणी होती की, लसीचा पुरवठा आम्हाला लवकर करा आणि आमच्या गतीनं करा. त्यामुळे आम्हाला अधिक वेगानं आणि उत्तमरित्या लसीकरण करणं शक्य होईल.”
“सध्याच्या घडीला महाराष्ट्र लसीकरणात आघाडीवर आहे. माझ्या मते, या महामारीला आळा घालण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या सर्वांची प्रतिकारक शक्ती वाढवणं आवश्यक आहे, त्यासाठी लसीकरणाचा मार्ग हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. लसीकरण मोफत आहे, लसीकरण सुरक्षित आहे. तसेच लसीकरण तुमच्या घराच्या जवळ आहे. त्यामुळे शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर टीम केलेल्या आहेत. ग्रामीण भागांत टीम केलेल्या आहेत. ज्यामध्ये आशा वर्कर्स, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस, तसेच ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक आणि तलाठी या साऱ्यांचा समावेश होतो. या चार लोकांची टीम करुन गावागावातून आणि वॉर्डा वॉर्डातून तुमचा सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल यांनी ४५ वर्षांवरील लोकांना घेऊन येऊन लसीकरण करुन घ्यावं हे बंधनकारक केलेलं आहे.”, असं आरोग्यमंत्री म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, “परंतु, सध्या प्रश्न असा आहे की, लस मिळत नाहीये. कालच्या बैठकीत मी पोटतिडकीनं विनंती केली की, आम्हाला लसीचा पुरवठा करा. कोविशील्ड द्या आणि खासकरुन आम्हाला कोवॅक्सिन द्या. कारण कोवॅक्सिनची मागणी लोकांकडून वाढलेली आहे. लस पुरवली तर आमचा एक महत्त्वाचा प्रश्न सुटेल.”
“सर्वात जास्त फिरणाऱ्यांमध्ये आणि कोरोना होणाऱ्यांमध्ये २० ते ४० वयोगटातील लोक आहेत. यामुळे या वयोगटाला होणारं इंफेक्शन कमी करायचं असेल तर त्या पद्धतीने लवकरच १८ वर्षापुढील सर्वांचं लसीकरण गरजेचं आहे. ही काळाची मागणी आहे. इतर ठिकाणी उशीर करा पण राज्यातील तरुण तरुणींना सुरक्षित करायचं आहे. त्यामुळे लवकर परवानगी द्या अशी मगाणीही केली आहे.” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता असून आम्हाला जवळच्या राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा केला पाहिजे अशी मागणी केली. ती त्यांनी गांभीर्याने नोंदवली आहे.” अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी यावेळी रेमडेसिवीरचा वापर प्रोटोकॉलनुसार करा असं आवाहनही खासगी डॉक्टरांना करत ११०० ते १४०० च्या वर विकू नये, अशी विनंती केली. तसेच त्याची साठवणुकही करु नका असंही ते म्हणाले.
“महाराष्ट्रात १४ लाख लसींचे डोस शिल्लक असून हा साठा केवळ तीन दिवस पुरेल अशी भीती व्यक्त करताना राजेश टोपे यांनी दर आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. महाराष्ट्रात लसीचे १४ लाख डोस शिल्लक असून ही तीन दिवसांपुरता साठा आहे. पाच लाखांच्या तुलनेत हे डोस तीन दिवसांत संपेल आणि महाराष्ट्रातील लसीकरण बंद होऊ शकेल. म्हणूनच दर आठवड्याला किमान ४० लाख लस पुरवठा केला पाहिजे. आज आम्ही साडेचार ते पाच लाखांपर्यंत आहोत. पण दोन दिवसांत दिवसाला सहा लाखांपर्यंत जाण्याची हमी मी देतो.” असंही ते म्हणाले. “केंद्र सरकार लस पाठवत नाही असं नाही पण वेग कमी आहे. ज्या पद्धतीने आव्हानात्मक बोललं जातं त्यापद्धतीने केलं जात नाही हे केंद्र सरकारला सांगणं आहे.” अशी टीकाही राजेश टोपे यांनी केली.