जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या २० ऑगस्ट २०२१ या शासन आदेशानुसार आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वात्सल्य समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे जिल्हा समन्वयक अँड. जमील देशपांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जमील देशपांडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मृत्यु झाल्याने २०००० पेक्षा जास्त महिला विधवा झाल्या आहेत. या महिलांचे पुनर्वसन व्हावे म्हणून महाराष्ट्राच्या २२ जिल्ह्यात आम्ही लेखक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, राज्य निमंत्रक यांच्या नेतृत्वाखाली “कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती” स्थापन केली असून या महिलांना शासकीय योजना मिळवून देणे, शासनाशी संवाद करणे, या महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे, कौटुंबिक अडचणी सोडवणे, अशा स्वरूपाचे काम करीत आहोत.
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासोबत आमची बैठक झाली. या बैठकीच्या अनुषंगाने शासनाने अनेक निर्णय घेतले. त्यात प्रत्येक तालुकास्तरावर समिती स्थापन करावी ही आमची मागणी शासनाने मान्य केली आहे. त्याबद्दल शासनाचे आभार. या अनुषंगाने आमच्या पुढील मागण्या आहेत. या शासन आदेशानुसार आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ही वात्सल्य समिती लवकरात लवकर स्थापन करावी,
या समितीच्या शासन आदेशानुसार क्र. १२ च्या तरतुदीनुसार विधवा महिलांसाठी काम करणारा संस्था प्रतिनिधी या अन्वये आमच्या समितीचे ३ प्रतिनिधी प्रत्येक तालुक्यातील समितीत समाविष्ट करावेत, तालुका समितीत ज्याप्रमाणे शासनाने विधवा पुनर्वसन काम करणारे कार्यकर्ते – घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे आपल्या नेतृत्वाखाली असलेल्या टास्क फोर्समध्ये आपल्या जिल्ह्यात विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या आमच्या “कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती” च्या २ जिल्हा समन्वयक यांचा समावेश करावा, त्यातून आमची समिती व आपण एकत्र काम करू शकू, असे यात म्हटले आहे.