नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) प्रशासनाच्या प्रयत्नांनी गावातील अवैध वाळू उपसा थांबल्यामुळे नांदेड गावातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
अवैध वाळू उपशामुळे तापी नदी काठाची प्रचंड हानी झालेली आहे. अवैध वाळू उपसा अतिशय मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नदीची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून शेतातील शेतकऱ्यांच्या ट्युबवेल तसेच इतर नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत कमी होताना दिसत आहेत. अश्याच प्रकारे उपसा होत राहिला तर पर्यावरणाच्या तसेच परिसरातील शेती व्यवसाय व संपूर्ण नदीचेच अस्तित्व धोक्यात येईल. दरम्यान, अवैध वाळू उपसा थांबल्याने ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा निश्वास सोडला आहे.
रात्रभर भरधाव वेगाने अवैध वाळूची होणारी वाहतूक व त्यातून होणारा गोंधळ यामुळे सर्वच नांदेड वासिय व परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. शेवटी अवैध वाहतूक थांबवण्यासाठी पर्यायी प्रतिबंध म्हणून प्रशासनाने तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वाहण्यासाठी वापरात येणारा रस्ता खोदून काढून वाहतूक बंद केली व तूर्तास आळा बसला आहे. स्मशान भूमीचाचा रस्ता तसाच सुरक्षित व शाबूत ठेवून पर्यायी रस्ता ज्यावरून चोरटी वाहतूक व्हायची तो रस्ता प्रशासनाने बंद केलेला आहे.