कोलकाता (वृत्तसंस्था) तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात १० जणांचा मृत्यू झाला आहे. बागुती गावात तृणमूल नेते भादू शेख यांच्या हत्येनंतर संतप्त लोकांनी अनेक डझन घरे पेटवून दिली. त्यात 10 लोक जीवंत जळाले. पोलिसांना एकाच घरात 7 मृतदेह आढळलेत.
पोलिसांनी सांगितले की, भादू शेख यांच्या हत्येप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर बीरभूमचे जिल्हाधिकारी, अग्निशमन विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. भादू शेख तृणमूल काँग्रेसचे रामपुरहाटचे पंचायत नेते होते. राज्य महामार्ग-50 वरुन प्रवास करत असताना सोमवारी रात्री त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. त्यांना उपचारासाठी रामपुरहाट वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत्त घोषित केले.
काही दिवसांपूर्वीच एकाच दिवशी झाली होती 2 नगरसेवकांची हत्या
गत 13 मार्चलाही पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार झाला होता. त्यात 2 नगरसेवकांना खूलेआम गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यातील एक तृणमूल, तर दुसरा काँग्रेसचा होता. तृणमूल नेते अनूपम दत्ता उत्तर 24 परगना जिल्ह्यातील पाणीहाटी नगर परिषदेच्या वॉर्ड क्र. 8 चे नगरसेवक होते. तर काँग्रेस नगरसेवक तपन कंडू पुरुलिया झालद्यातून 4 वेळा विजयी झाले होते. या दोघांनाही दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी गोळ्या घातल्या होत्या. तृणमूल नेत्याच्या हत्येची संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती.