मुंबई (वृत्तसंस्था) समीर वानखेडे व शबाना यांचा विवाह लावलेले काझी मुजम्मिल अहमद माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी समीर हे लग्नावेळी मुस्लिमच होते, असं स्पष्ट केलं आहे. ते मुस्लिम नसते तर विवाह झालाच नसता, असा खुलासाही त्यांनी केला आहे. तसेच समीर वानखेडे खोटं बोलत असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.
समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न डॉक्टर शबाना कुरेशी यांच्यासोबत झालं. हे लग्न मुस्लीम पद्धतीने झालं. मात्र, आईच्या आग्रहाखातर मुस्लीम पद्धतीने विवाह केल्याचा दावा समीर वानखेडेंनी केला असताना त्यांचं लग्न लावणाऱ्या काझींनी मात्र वेगळाच दावा केला आहे. “जर समीर वानखेडे हिंदू असते, तर त्यांचा निकाह झालाच नसता”, अशी भूमिका त्यांचं लग्न लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी घेतली आहे. “जर ते हिंदू असते, तर निकाहच झाला नसता. सगळेच मुसलमान होते. समीर, शबाना, त्यांचे वडील दाऊद आणि मुलीचे वडील जाहीद हे देखील मुसलमानच होते. मुसलमान नसते, तर हे नातंच झालं नसतं, काझीनं हा निकाह पढला नसता आणि २ हजार लोकांना दावत देखील झाली नसती”, असं ते म्हणाले आहेत.
समीर वानखेडे खोटा दावा करत असल्याचं मुजम्मिल अहमद यावेळी म्हणाले. “समीर वानखेडे खोटं बोलत आहेत. ते चुकीचं सांगत आहेत. तेव्हा त्यांनी निकाह झाल्यानंतर मुस्लीम म्हणून सही देखील केली. तेव्हा सगळं केलं. आता त्यांनी काहीही सांगावं”, असं ते म्हणाले.