नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीमध्ये मंगळवारी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसेनंतर पोलिस सलग कारवाई करत आहेत. गाजीपूर सीमेवर दिल्ली आणि यूपीचे पोलिस पोहोचले असता सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी गाजीपूर बॉर्डरवरील शेतकऱ्यांना आजच रस्ता रिकामा करण्यास सांगितले आहे. पोलिसांच्या सूत्रांनुसार बॉर्डर रिकामी करण्यासाठी दिल्ली आणि यूपीचे पोलिस जॉइंट ऑपरेशन करु शकतात. तर दुसरीकडे सिंघु सीमेवरही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिस कमिश्नर एस एन श्रीवास्तव यांनी सीनियर अधिकाऱ्यांसोबत मीटिंग केली आहे. पोलिसांनी गाजीपूर सीमेवर लावलेले पोर्टेबल टॉयलेट्स हटवण्यास सुरुवात केली आहे. यूपी रोडवेजच्या डजनभर बस देखील येथे उभ्या करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे बागपतमध्ये ४० दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी बुधवारी रात्री हटवले होते. पोलिसांनी गुरुवारी शेतकरी नेत्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली. म्हणजेच ते विना परवानगी विदेशात जाऊ शकत नाहीत. दरम्यान एका तासानंतर वृत्त आले की, लाल किल्ल्यावर हिंसा करणाऱ्यांवर पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. लुकआउट नोटीस कोणकोणत्या शेतकरी नेत्यांच्या विरोधात जारी करण्यात आली आहे याची पुष्टी झालेली नाही. मात्र असे मानले जात आहे की, ज्या ३७ नेत्यांच्या विरोधात पोलिसांनी बुधवारी FIR दाखल केला होता, त्यांच्याच विरोधात ही नोटीस जारी करण्यात आली आहे. दुसरीकडे, शेतकरी नेता युद्धवीर सिंह यांनी हिसेंच्या घटनेवर माफी मागत म्हटले की, ‘प्रजासत्ताकदिनी जे झाले ते लाजिरवाणे आहे. मी गाजीपूर बॉर्डरजवळ होतो. जे समाजकंटक तिथे घुसले त्यामध्ये आमच्या लोकांचा समावेश नव्हता. तरीही मला हे लाजिरवाणे वाटते आणि ३० जानेवारीला उपवास ठेवून आम्ही प्रायश्चित करु’
दिल्लीमध्ये मंगळवारी झालेल्या हिंसाचारामध्ये दिल्ली पोलिसांचे ३०० हून अधिक जवान जखमी झाले. त्यापैकी बरेच जण अद्याप रुग्णालयात दाखल आहेत. यातील काही जवानांची स्थिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी सुश्रुत ट्रॉमा सेंटर येथे भेट दिली.
रॅलीच्या अटी खंडित केल्याच्या आरोपाखाली ३७ शेतकरी नेत्यांविरूद्ध पहिले एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा २० शेतकरी नेत्यांना नोटीस जारी करुन ‘आपल्यावर कायदेशीर कारवाई का होऊ नये, ३ दिवसात याचे उत्तर द्या’ अशी विचारणा करण्यात आली. आतापर्यंत नोटीस दिल्या गेलेल्या ४ नेत्यांची नावे समोर आली आहेत. हे नेते योगेंद्र यादव, दर्शन पाल, बलदेवसिंग सिरसा आणि बलबीरसिंग राजेवाल आहेत. पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्याची तोडफोड करणे देशविरोधी कृती आहे.