मुंबई (वृत्तसंस्था) सापालाच्या पिल्लाला आम्ही ३० वर्षे दूध पाजले, आता ते वळवळ करत आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजपवर केली आहे. रकार पडणार म्हणतात, माझे १७० मोहरे आहेत, ते फोडून दाखवा असंही आवाहन त्यांनी भाजपला दिलं आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या सततच्या छाप्यांमुळे आपण दबून न जाता आक्रमकपणे तोंड देऊ असे सूचित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदारांना हिम्मत देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी आक्रमकपणे आरोपांना तोंड देईल हेच मुख्यमंत्र्यांनी सूचित केल्याचे बोलले जात आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर येथे बैठकही घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेचे आमदार आणि मंत्री उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार लवकरच पडेल, अशी वक्तव्ये भाजपचे नेते सतत करत आहेत. अलिकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील आघाडी सरकार पडण्याबाबत वक्तव्ये करत आहेत. यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत भाजपला आव्हान दिले आहे. माझे तुम्हाला आव्हान आहे की माझे १७० मोहरे तुमच्या गोटात घेऊन दाखवा आणि सरकार पाडून दाखवा असे आव्हान ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नेत्यांच्या घरी छापे टाकून त्यांच्यावर कारवाया करणे सुरू ठेवले आहे. यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर दाऊदला पकडून दाखवा, छापे कसले टाकता.. आता हे छापे बंद करा, आघाडी सरकार हे छापे आता खपवून घेणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे.