मुंबई (वृत्तसंस्था) कांजूरमार्गची जमीन मिठागराची आहे असं काही जणं म्हणतायेत. असे म्हणणाऱ्यांना एक कळत नाही ते मुंबईकरांच्या प्रकल्पांमध्ये मिठाचा खडा टाकत आहे. आरेची कारशेड कांजूरमार्गला नेली त्यावर सर्व उत्तर आपल्याकडे आहेत. हे सर्व टीका करतायेत त्यांना योग्य उत्तर देऊ,’ असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मागील भाषणात मेट्रो कारशेडबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. आरे ऐवजी मुंबई मेट्रो कारशेड आता कांजूरमार्ग येथील शासकीय जागेवर होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्यानंतर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध केला होतं. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. तर, कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचारही घेतला आहे. ‘मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा मिठागराची आहे असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रकल्पात कोणीही मीठाचा खडा टाकू नका. मुंबईकरांसाठी कोणत्याही टीकेची पर्वा न करता काम करणार,’ असं सडेतोड उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं आहे.
















