धुळे (प्रतिनिधी) जिल्ह्यातील वाहनचोरीच्या घटना तसेच सामान्य जनतेचे जीवन असुरक्षीत करणाऱ्या नकली रिव्हॉलव्हर (देशी कट्टा) विक्रीचा व्यवहार, धुळे जिल्ह्यातील गांजा उत्पादन तसेच वाहनांची चोरी करुन विक्री करणाऱ्या व्यवसायाबद्दलची विस्तृत माहिती जनतेला देण्यात यावी, अशी मागणी धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जिल्ह्यातील वाहनचोरीच्या घटना तसेच सामान्य जनतेचे जीवन असुरक्षीत करणाऱ्या नकली रिव्हॉलव्हर (देशी कट्टा) विक्रीचा व्यवहार, धुळे जिल्ह्यातील गांजा उत्पादन तसेच वाहनांची चोरी करुन विक्री करणाऱ्या व्यवसायाबद्दलची विस्तृत माहिती यापूर्वी दिली आहे. माझ्यालेखी हे विषय अतिशय गंभीर आहेत. यासाठी की, अशा समाज विघातक व समाजकंटकांपासून आम जनतेच्या जीवीत व मालमत्तेच्या रक्षणासाठी पोलीस विभागाची निर्मिती झाली आहे. जनतेच्या रक्षणाची जबाबदारी घेतलेले आपल्या अधिपत्याखालील पोलीसच अवैध व्यवसायाचे सुत्रधार आहेत. शासकीय सेवेत रुजू होतांना आपणास दिल्या जाणाऱ्या शपथेमध्ये सामान्य माणसाच्या जीवीताच्या व मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारली असते. या जबाबदारीत एखाद्या सरकारने बदल घडवून आणला आहे काय ? अशी रास्त शंका निर्माण झाली आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे आपल्या विभागाचे ब्रीदवाक्य एखाद्या सरकारने परस्पर बदलले तर, नाही ना ? ‘खलरक्षणाय’ म्हणजे समाजातील वाईट प्रवृत्तींचे रक्षण करा’ व सद्निग्रहणाय म्हणजे समाजातील चांगल्या लोकांवर बारीक लक्ष ठेवून, चांगल्या लोकांना जितका जास्त त्रास देता येईल तेवढा त्रास द्या.’ यासाठीच गृहखात्यातील कर्मचाऱ्यांला सरकार पगार देतय की काय ? असा साधा सरळ प्रश्न माझ्यासारख्या भोळ्या भाबड्या माणसाला सतावत असतो. कारणही तसेच आहे. मोगल काळात वसुलीसाठी सुभे’ वाटून घेत असत. तसेच आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाने आपले विभाग वाटून हद्दी निश्चित करुन घेतल्या आहेत. माझ्या हद्दीत अन्य कुणी यायचे नाही, दुसऱ्याच्या हद्दीत, तिसऱ्याने जायचे नाही. जणुकाही यांच्या बापाची मनसबदारीच आहे. तुमचे अधिकारी अत्यंत बेशरमपणे आणि निर्लज्जपणे ‘तुला तुझा भाग दिला आहे ना ! जा ना, तिथे गू खा, तू कशाला याच्या त्याच्या भानगडीत पडतो. थोडक्यात भ्रष्टाचाराची शिस्त का बिघडवतो ? पोलीस विभागातील एखादा अधिकारी आपल्या हाताखाली काम करणाच्याला असे बोलूच कसे शकतो ? या बाबतीत आपल्या वरिष्ठांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आपणास मुद्दाम जाणीव करुन देतो. असे अनिल गोटे म्हणाले.
मी आपणास यापूर्वीही हे संभाषण पाठवले होते. ते पुन:श्च पाठवीत आहे. यासाठी की, गृहखात्याने दि २४ ऑक्टोबर २००७ रोजी खालील परिपत्रक काढले आहे.
सदर परिपत्रकामध्ये स्वच्छ शब्दात लिहिले आहे. की, महाराष्ट्र पोलीस नियमावली भाग-१ मधील नियम ४४२ १) मध्ये पोलीस अधिकारी / कर्मचारी हे कसुरदार आढळून आल्यास त्यांना कोणत्या परिस्थित निलंबित करावे याबाबतची मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली आहेत. या नियमानुसार कसुरी गंभीर स्वरुपाचा असेल व प्रथमदर्शनी पुराव्यावरुन प्रकरण सेवेतून काढून टाकणे व बडतर्फ करण्याजोगे असेल अथवा त्यास सेवेत ठेवल्याने तपासात अडचणी येतील अथवा हस्तक्षेप होईल याचा विचार करुन सक्षम अधिका-यांनी निलंबनाचे आदेश काढले पाहिजेत. परंतु, असे निदर्शनास आले आहे की, काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेविरुध्दची कसुरी गंभीर स्वरुपाची नसतांना व प्रथमदर्शनी पुराव्यावरुन प्रकरण सेवेतून काढून टाकणे अथवा बडतर्फ करण्याजोगे नसतांना सक्षम प्राधिकाऱ्यांनी त्यांना निलंबीत केलेले आहे. मात्र विभागीय चौकशीमध्ये अशा कसुरदारांना दंड किंवा ‘सक्त ताकिद अशी सौम्य स्वरुपाची शिक्षा देण्यात आली आहे. अशा प्रकरणी कसुरदार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा निलंबन काळ नियमित करण्यास फारच अडचणी निर्माण होत आहेत. विभागीय चौकशीमध्ये ‘सक्त ताकीद’ किंवा ‘दंड’ अशा स्वरुपाची शिक्षा दिल्याने सहाजिकच कसुरीतील त्यांचे निलंबन महाराष्ट्र नागरी सेवा ( पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ च्या नियम ७२ (३) मधील तरतुदीनूसार समर्थनिय ठरत नाही. परिणामी, कसुरदार अधिकारी / कर्मचारी यांचा निलंबनकाळ हा सर्व प्रयोजनार्थ कर्तव्यकाळ म्हणून नियमित करावा लागतो.
२. तरी, सर्व घटक प्रमुखांना विनंती आहे की, त्यांनी कसुरदार अधिकारी / कर्मचारी यांचेविरुध्दच्या कसुरीच्या स्वरुपाचा अभ्यास त्यांचेवर निलंबनाची कार्यवाही करावी. अशी मागणी अपर पोलीस महासंचालक ओ. अल. वर्मा यांनी केली आहे.
आपल्या अंरतमनाला प्रामाणिकपणे विचारा की, खरोखरच या पोलीस कर्मचा-्यांचा एवढा गुन्हा होता का ? एवढा दोष होता का ? की केवळ लाडावून ठेवलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे लाड आणि त्यांच्या मर्जीप्रमाणेच व त्यांच्या लहरीनुसार त्यांच्या भ्रष्टाचाराला सोईचे असेल अशीच आपल्या कामाची पध्दत असेल का ? आपण जिल्ह्याचे ‘सर्वास्वा आहात. आपणाकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या पोलीस शिपायाला आपण आधार द्यायचा सोडून, त्याचे म्हणणे ऐकून घेण्यापूर्वीच त्याची बदलीच करुन टाकता ? निलंबन करता ? आपणा समवेत एखादा वरिष्ठ अधिकाऱ्याने अशी वर्तवणुक केली तर आपणास किती वेदना होतील ? पोलीस कॉन्स्टेबलला मन, भावना, वेदना आहेत की नाही ? माझ्यासारख्या त्रयस्थ व्यक्तीला प्रश्न पडतो की, पोलीसांचे वरिष्ठ अधिकारी आहेत तरी, नेमके कोणाच्या बाजुने ? जनतेच्या की, लुट करणाऱ्या लुटारुंच्या ? आपण सदर रिव्हॉलवर प्रकरणी सुमोटो गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. दुर्देवाने तसे घडले नाही. उलट ‘व्हसल ब्लोर’ कमंचाऱ्यांविरुध्दच बदली निलंबनाची कारवाई केली. मी आपणासही विनंती केली होती. की, निरपराध पोलीस कर्मचान्यांविरुध्द केलेली कारवाई. स्थगित करावी. दुर्दैवाने आपण माझ्या विनंती मागील गांभीर्य समजून घेतले नाही. यामुळे सदर रिव्हॉलवर प्रकरणातील पडद्याआड घडलेल्या घटना या पत्रात विदीत करणे क्रमप्राप्त आहे. असे देखील अनिल म्हणाले.
कांदीवली क्राईम ब्रांचचे वरीष्ठ निरीक्षक सुनिल माने यांच्या पथकाने मुंबई येथे दोन गावठी कट्टयासह दोन आरोपींना ताब्यात घेतले. सदर आरोपींनी सदर कट्टे शहादा व धुळ्यातून घेतल्याची माहिती दिली. सदर माहितीच्या अनुषंधाने क्राईम बॅचचे वरिष्ठ निरिक्षक सुनिल माने यांच्या पथकातील शेख या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आलेल्या दोन अधिकार्यांनी शहादा येथुन गावठी कट्ट्यासह एकास व धुळ्यातून ** नावाच्या आरोपीकडून गावठी कट्टा जप्त केला. सदर आरोपींना फटके पडताच पोलीस खात्याच्या एका एल.सी.बी. मधील ज्यांच्या नावाची सुरवात ग’ व अडनाव ‘स’ नावाचे आहे. त्यांचे दुसरे साथीदार ‘रा’ व ‘सा’ व एक साथीदार मुस्लिम असून यांनी सदर कट्ट्यांची आरोपीच्या मार्फतीने विक्री केले असल्याचे तपासी अधिकाऱ्यांना सांगितले. मुंबई क्राईम ब्रांच्या अधिकाऱ्यांनी तिनही पोलीस कर्मचाऱ्यांना तपासासाठी मालेगावला बोलविले, हे प्रकरण दोनचार कट्ट्यांपुरते मर्यादित नसून दोनशे ते अडीचशे गावठी कट्ट्यांच्या संदर्भात असल्याने प्रकरणाची व्याप्ती मोठी होती. मालेगाव येथील डायव्हर्शन रोडला असलेल्या एका हॉटेलमध्ये या प्रकरणाच्या वाटाघाटी झाल्या. मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या तीनही कर्मचाऱ्यांना आपल्या ताब्यातच ठेवले. त्याच हॉटेलमध्ये ते मुक्कामास होते. सदर प्रकरणाची धग धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेपर्यंत पोहोचण्याचा धोका लक्षात येताच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रत्यक्ष शिवाजीच मदतीला धावून गेले. मला समजलेला आकडा ८० लाखाचा आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता. देवाण घेवाणीची रक्कम वाढ़ शकते. कमी होण्याचे कारणच नाही. पोलीसांनी पोलीसांकडूनच खंडणी वसूल केली.
आपण भारतीय सेवेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी आहात, तपास कसा करायचा ? आरोपीला कसे हूडकवून काढायचे ? कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या भानगडीपासून अलिप्त राहून त्यांच्यावर कसे नियंत्रण ठेवायचे ? याचे विशेष प्रशिक्षण आपणास दिले जाते. आपल्या प्रशिक्षणाचा व कौशल्याचा या तपासकामी निश्चितच वापर होईल एवढी माझी किरकोळ अपेक्षाही पूर्ण झाली नाही.
धुळे जिल्ह्यात वाहन चोरांची एक टोळी कार्यरत आहे. दुर्दैव असे की, सदर टोळीचे सुत्रधार अन्य कुणी नसून पोलीस अधिकारीच आहेत. हे सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे. आपल्या खात्यातील पोलीस कॉन्स्टेबल दर्जाचे कर्मचारी फॉरच्युनर, नेक्सॉन, इनोव्हा, इंडीव्होर यासारख्या महागड्या गाड्या घेऊन कामावर येतात. हे खरच आपल्याला माहित नाही का ? जर माहीत नसेल तर, याच्याएवढे दुर्भाग्य नाही. स्वतःच्या खुर्ची खालून निघत असलेल्या धुराचे मुळ आपणास शेधता आले नाही. अन्य अर्थाने शोधायचेच नाही. मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक काळी गाडी एम.एच.१४, ७४०० गेल्या सहा महिन्यापासून उभी आहे. गाडी सोबत हातात आलेल्या आरोपीला सोडून देण्यात आले. बदल्यामध्ये ४ लाख रुपयाची देवाण घेवाण करण्यात आली. हेही आपल्या कानावर आले नाही का ? चोरीच्या गाडी प्रकरणात आपण नेमकी काय माहिती गोळा केली ? किती गांभिर्याने सदर प्रकरणाचा आपण विचार करीत आहात ? मीच आपणास काही प्रश्नांची उत्तरे शोधावीत असे सुचवीत आहे.
अ) धुळे जिल्हा पोलीस खात्यातील किती कर्मचारी चार चाकी गाड्या वापरीत होते ?
ब) किती कर्मचारी बिगर नंबर प्लेटची बहाने वापरत होते ?
क) अशा वाहनांचा उपभोग किती काळ त्यांनी घेतला आहे ?
ड) जप्त केलेल्या वाहनांचे जप्ती पंचनामे न करताच जिल्ह्यातील किती पुढाऱ्यांना अशा
गाड्या वापरण्याकरीता अथवा भेट म्हणून दिल्या होत्या?
इ) काही मस्तवाल व माजेल पोलीस अधिकारी होलसेल दारु विक्रेत्याने अल्कोहोलचे दोन टैकर सोडण्याच्या बदल्यात विकत घेऊन दिलेली गाडी वापरत आहेत ?
फ) फॉरच्युनर, इनोव्हा, इंडिव्होर, जीप, आयटेन, आय टेन्टी, महिंद्रा, स्कॉर्पीओ इत्यादी नव्या कोन्या गाड्या बिगर नंबर प्लेटने पोलीस व पुढारी वापरत होते. या संबंधी आपण काही माहिती मिळवली का ?
ग) वाढदिवसा निमित्ताने नव्या कोऱ्या एक्कावन्न बुलेट सप्रेम भेट देणारा हा रावसाहेब कोण!
ह) भुषण सुर्वेच्या संभाषणात आलेल्या रावसाहेबचा संदर्भ किती लफड्यांमध्ये आहे ? या रावसाहेबचा तपास केला का ?
दोंडाईचा व सिंदखेडा पोलीसांबद्दल मी वक्तव्य करताच आपणास मिरच्या झोंबल्या. त्या झोंबाव्यात अशी माझी मनापासूनची इच्छा होती. म्हणूनच मी चिमठाणा येथे मुद्दाम दुसर्यांदा बोललो, माझ्या अपेक्षेप्रमाणेच प्रतिक्रीया आल्या. मला काही आश्चर्य, वैशम्य वाटले नाही. कुणी कुणाला कसे उचकवले. माझ्याविरुध्द मोर्चा काढायला समाजातील कुणी सज्जन प्रतिनिधी, विचारवंत सापडले नाहीत. नामचीन गुंडाचा आधार घ्यावा लागला. नैतिक अध:पतन या व्यतिरिक्त अन्य काही असते काय ? अखेरीस दोंडाईचा, सिंदखेडा येथील पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने बदलावे लागलेच ना ! मी जे बोलतो, लिहीतो ते तिखट असते. झांबते. त्यासाठीच तर, हे सर्व करतो. यात माझा कुठलाही व्यक्तीगत स्वार्थ असत नाही. सामान्य जनतेच्या दुःखाचा संताप त्यात असतो. श्रीमंत न्याय विकत घेवू शकतात. गरीबांना उपाशीपोटी राहून लढून, झगडून मिळवावा लागतो. जनतेच्या कल्याणासाठी पोलीस जेवढी मदत करु शकतात तेवढी परमेश्वर करु शकत नाही. अशी मदत विकत घेण्याची ऐपत नसणाऱ्यांसाठीच मी आयुष्यातील पन्नास पंचवन्न वर्षे खर्ची घातली आहेत. हे उच्च वर्णीय व उच्च वर्गीय घारात जन्माला आलेल्यांना कळूच शकत नाही.
माहित नसलेले किंवा एकीव माहीती असलेले अथवा दडपण्यात आलेला एका गुन्ह्याची सत्य माहिती आपणास देतो. सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत भाग ५ रजीस्टर नं. ७७/२०१९ भा.द.वी. कलम ३०२, ३४ वगैरे मयत गोपाल काब्रा राहणार सरेला सोसायटी बँक ऑफ बडोदाच्या मागे नवरंगपूरा अहमदाबाद या गुन्ह्याचा तपास एल.सी.बी. म्हणजे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला. गुन्ह्यातील रक्कम थोडी थोडकी नसून १० कोटी रुपयाची आहे. एवढ्या मोठ्या आर्थीक गुन्ह्यातील खुनाच्या आरोपींना अन्यत्र कुठे जामिन मिळतो की नाही याची मला जाणीव नाही. पण, एक गोष्ट निश्चित की, धुळे जिल्हा पोलीस यंत्रणा अशी जबरदस्त यंत्रणा आहे. की, आरोपीला अटक करताच ठरावीक कालमर्यादेत जामीन मिळवून देण्याच टेंडरही सुरवातीलाच भरुन टाकतात. यामुळे मोठ मोठे आरोपी धुळे जिल्ह्याच्या हद्दीत येवूनच गुन्हे करीत असावेत पूर्वी धुळ्यात बारीवीची परिक्षा देण्याकरीता शहरातील विद्यार्थी नगाव, कापडणे, सोनगीर अशी परिक्षा केंद्रे निवडत असत. तीच परंपरा वेगळ्या अर्थाने पोलीस खाते कायम राखत आहे. की काय ? अशी शंका निर्माण होते. अर्थात आपणास जितक्या शांतपणे व संयमी शब्दांमध्ये समजून सांगणे मला शक्य होते. त्याचे मी मनापासून प्रयत्न केले. अखेर परमेश्वरच मालीक!, असे धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हंटले आहे.