नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीन प्रश्नी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे. डेपसांगमधून चीन मागे हटणार होता त्याचे काय झाले असा सवाल स्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे.
पँगॉंग सरोवर परिसरातून सैन्य माघारी घेतलं जात असतानाच सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत पंतप्रधान व मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “२०२० मध्ये पंतप्रधानांनी म्हटलं होतं की, ‘कुणीही आलं नाही, कुणी गेलं नाही.’ चीनला हे खूप आवडलं होतं. पण, हे सत्य नव्हतं. नंतर लष्करप्रमुख नरवणे यांना आदेश दिले गेले की, त्यांनी एलएसी पार करून पॅंगॉंग सरोवर ताब्यात घ्यावा, जेणेकरून चिनी चौक्यांवर नजर ठेवता येईल. आता आपण तिथून पाठीमागे येत आहोत, पण डेपसांगमधून चीन पाठीमागे जाण्याचं काय झालं? आतापर्यंत झालेलं नाही. चीन खूपच खुश आहे,” अशा शब्दात स्वामी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.