मुंबई (वृत्तसंस्था) विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाला काल सुरुवात झाली. मात्र अधिवेशनाचा पाहिलाच दिवस वादळी ठरला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन झालं आहे. दरम्यान या सर्व घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ‘काल जे काही घडलं, हे कितीही कुणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं.’, असे म्हणत विरोधकांवर टीका केली आहे.
”काल जे काही घडलं, हे कितीही कुणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं. ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. हल्ली जे काही चाललेलं आहे. ते बघितल्यांतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडतो. पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ”लोकप्रतिनिधींकडून जनतेची एक वेगळी अपेक्षा असते, की का मी तुम्हाला मत देतोय? तर माझ्या आयुष्यात काही चांगला बदल घडला पाहिजे आणि तो जिथे घडवला जातो, तिथे मी तुम्हाला पाठवतो आहे. तिथे गेल्यानंतर काल जे काही दृश्य पाहायला मिळालं, खरोखर शरमेने मान खाली जावी असं ते दृश्य होतं आणि जबाबदार पक्षाकडून हे घडलं. हे आम्ही घडवलेलं नव्हतं.”
वेडवाकडं वागायचं, आरडाओरडा करायचा. हे करायचे असेल तर रस्त्यावर करु शकता. मात्र, सभागृहामध्ये माईक असतात. माईक ओढायचे हे काही आरोग्यदायी लोकशाहीचे लक्षणं नाही. भास्करराव यांच्या दालनात जे काही घडलं त्यातील बरचसं वर्तन त्यांनी केलं. ते ऐकल्यानंतर सिसारी यावं असं हे वर्तन आहे. हा देशात तसेच राज्यात पायंडा पाडयाला नको आहे. त्यासाठी प्रत्येकांना आपली मर्यादा काय आहे, हे समजून घ्यायला हवे, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.
सभागृहात सरकारविरोधात दिलेल्या घोषणा लांछनास्पद : मुख्यमंत्री
काल सभागृहात जे घडलं त्यामुळे मी दु:खी आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु भास्कर जाधव यांच्या दालनाता त्यांच्या सोबत काय झाले हे ऐकून आपण ही या घटनेचा निषेध कराल. एखाद्या जबाबदार पक्षाच्या वतीने असे वागणे ठीक नाही. हे वर्तन महाराष्ट्रात घडू शकतं यावर माझा काय कुणाचाच विश्वास बसणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.