औरंगाबाद (वृत्तसंस्था) सोशल मीडियावरून प्रेमात पडलेली नागपूरची पदवीधर तरुणी काल औरंगाबादेत तरुणाला भेटायला आली. यावेळी चहा पित असताना तरुणाच्या मेव्हण्याने त्याला ओळखून रंगेहाथ पकडले. तरुणाचे आधीच दोन लग्न झाल्याचे कळताच तरुणीच्या पायाखालची जमीन घसरली. या दोघांमध्ये चांगलाच वाद झाल्यानंतर हे प्ररकण पोलिसात गेले. यामुळे तरुणीचे चांगलेच डोळे उघडले.
सुशिक्षित कुटुंबातील ही २१ वर्षीय तरुणी सोशल मीडियावरून २४ वर्षीय तरुणाच्या प्रेमात पडली. दोघेही रोज एकमेकांशी बोलू लागले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. निसारने तिला लग्नाची मागणी गातली. तिने गेल्या आठवड्यात थेट घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तरुण दोन दिवसांपूर्वी तिला घ्यायला गेला. नागपूरहून दोघेही पळून आले. तरुण पाचवी शिकलेला असून ट्रकचालक आहे. मात्र त्याने हे सर्व तरुणीपासून लपवून ठेवले. बुधवारी दुपारी दोघेही क्रांती चौकात चहा घेण्यास थांबले असता तरुणाच्या दुसऱ्या पत्नीच्या भावाने त्याला मुलीसोबत रंगेहाथ पकडले. त्याची चांगलीच धुलाई केली. स्थानिकांनाही तरुणाने आरेरावीची भाषा केल्याने लोकांनीही चांगलाच हात साफ करून घेतला.
हाणामारीचे हे प्रकरण क्रांतीचौक पोलिसात गेले. निरीक्षक डॉ. गणपत दराडे, डीओ पोलिस अधिकारी डॉ. विशाल इंगळे यांनी दोघांची बाजू समजून घेतली. पोलिसांसमोर खरा प्रकार समोर आल्यानंतर सहा महिन्यांच्या मैत्रीवर विश्वास ठेवणे चुकल्याची नेहाला जाणीव झाली. पोलिसांनी तत्काळ तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला. त्यानंतर वडिलांशी बोलणे झाल्यावर मुलीने आपली चूक कबूल केली आणि नागपूरला जाण्याची तयारी दर्शवली. यावेळी तरुणाचे कुटुंब देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.