जालना (वृत्तसंस्था) कोरोना महासाथीचा देशात सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रावर आता ओमिक्रोनचे संकट येणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कोरोनाच्या ओमिक्रोन व्हॅरियंटबाबत आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. ओमिक्रोन व्हेरिएंटमुळे देशात आणि महाराष्ट्रात त्याचा लगेच परिणाम व्हावा अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
राजेश टोपे म्हणाले की, १ डिसेंबरला राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र, आमची याला नाहरकत आहे. कारण कोरोनाचा आफ्रिकेत नवा विषाणू आढळला म्हणजे लगेच त्याचा महाराष्ट्रात परिणाम होईल असे नाही. त्यामुळे शाळा सुरू करायला आमची हरकत नाही. मात्र, शाळा सुरू करण्याबाबत उद्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होईल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
आरोग्य मंत्री म्हणाले की, आतापर्यंत ८५ टक्क्यांपर्यंत लसीकरण केले आहे. आता ते १०० टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. ५ लाख लसीकरण रोज होत आहे. कोरोनात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना ५० हजारांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. आम्ही नवा विषाणू सापडल्याने दक्षिण आफ्रिकेतील विमाने बंद करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. मात्र, त्यांनी अभ्यास करून काय तो निर्णय घ्यावा.
राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाचा नवा सापडलेला विषाणू, लसीला निष्प्रभ करून वाढतो. याचा अभ्यास झाला आहे. हा काळजी करण्यासारखा व्हेरिएंट आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. राज्य केंद्र सरकारला याबाबत पूर्ण माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांनी आफ्रिकेवरून येणारे विमान थांबवावे, अशी विनंती केली आहे. केंद्र शासन काय निर्णय घेणार याकडे आमचे लक्ष लागले आहे. मात्र, तूर्तास असा व्हेरिएंट देशात आढलेला नाही. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या लोकांनावर लक्ष ठेवतोय. त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यांना ७२ तासांची आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.