नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरु आहे. कोरोनाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्लीसह १२ राज्यांत कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. ही परिस्थिती पाहता देश लाॅकडाऊनच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सध्या संपूर्ण देशात लाॅकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
निवडणूक प्रचार आणि कोरोनाचा उद्रेक यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले,”बघा, महाराष्ट्रात निवडणूका आहेत का? तिथे ६० हजार रुग्ण आहेत. पश्चिम बंगालमध्ये ४ हजार आहेत. महाराष्ट्रालाही माझी सहानुभूती आहे आणि बंगाललाही. कोरोना रुग्णवाढीला निवडणुकीसोबत जोडणं योग्य नाही. ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्यापेक्षा जास्त जिथे निवडणुका नाही झाल्यात तिथे जास्त रुग्ण वाढले आहेत. यावर तुम्ही काय म्हणाल?,” असं शाह यांनी सांगितलं.
लॉकडाउनशी संबंधित प्रश्नावर बोलताना शाह म्हणाले, “देशात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही. सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नाही. केंद्राकडून तत्परता दाखवली जात नाही, असं नाही. हे खरं नाही. मुख्यमंत्र्यांसोबत दोन बैठका झाल्या आहेत. त्या बैठकांना मी सुद्धा उपस्थित होतो. लसीकरणासंदर्भात वैज्ञानिकांशीही चर्चा सुरू आहे. कोरोनाशी लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. कोरोना संक्रमण प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं लढा देणं थोडं कठिण आहे. पण, मला विश्वास आहे की, आपण त्यावर विजय मिळवू,” असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.