छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) चार मुलांसह पहिली बायको सोडली. त्यानंतर दुसरीसोबत लिव्ह इनमध्ये राहिला. तिच्यापासून मुलगी झाली. याच काळात त्याने अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवले. तिलाही मुलगा झाला. शेवटी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) त्याला बेड्या ठोकल्याच. सुभाष फकिरा राठोड (४१, मूळ रा. पोखर्णी, ता. गंगाखेड, जि. परभणी, ह.मु. इंदिरानगर) असे आरोपीचे नाव आहे.
येत्या ५ मे रोजी १८ वर्षे पूर्ण होतअसलेल्या मुलीस सुभाषने २१ सप्टेंबर २०२१ रोजी पळवून नेले होते. त्यामुळे पिडीत मुलीच्या आजीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘एएचटीयू पथकाने सखोल तपास करून सुभाषला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने मुलीला पळविले तेव्हा तिचे वय १६ वर्षे होते. तिला मुलगा झाला असून तो आता पाच महिन्यांचा आहे. मुलीला पुंडलिकनगर पोलिसांकडे सोपविले आहे. ही कारवाई निरीक्षक शिवाजी तावरे, सहायक निरीक्षक सुषमा पवार यांच्या पथकाने केली.
पीडित अल्पवयीन मुलीच्या आई- वडिलांचे निधन कोरोनात झाल्यामुळे ती आजीकडे आली होती. गजरे विक्रीचे पैसे आजीच घेत होती. त्यातच तिला आजी त्रास देत होती. आजीच्या त्रासामुळे ही मुलगी मैत्रिणीच्या घरी जाई. मैत्रिणीचा पती अर्थात सुभाषने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत कुमारी माता बनवले होते. दरम्यान, सुभाषचा विवाह झालेला आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुली, एक मुलगा आहे. ती महिला मुलांसह माहेरी राहते. त्यानंतर दुसरीला एक मुलगी आहे. तर तिसरी अल्पवयीन मुलगीलाही राठोडपासून एक मुलगा झाला आहे. धक्कादायक म्हणजे या दोघी एकत्रच राहत होत्या.