मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांत गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या फेरबदलांवरुन शिवसेनेने आपलं मुखपत्र असलेल्या सामनातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपतील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील, असं सामना अग्रलेखात म्हंटल आहे.
गुजरातमधल्या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्याच पक्षाला संदेश दिला असल्याचं यात म्हटलं आहे. “रुपाणी यांच्यामागे अमित शहांचे पाठबळ होते. पण रुपाणी आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाला घरचा रस्ता दाखवून मोदी-नड्डा जोडीने एक जोरकस संदेश स्वपक्षास दिला आहे. नितीन पटेल स्वत:ला हेवीवेट समजत होते. पण नेतृत्वाची घडीच पूर्णपणे बदलून टाकताना पाटीदार समाजाचे नेते नितीन पटेल यांनाही मोडून काढले. हे धाडसाचे काम असले, तरी स्वपक्षात अशी धाडसी पावलं मोदीच टाकू शकतात”, असं यात म्हटलं आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदींच्या नेतृत्वगुणांचं कौतुक करतानाच राज्यातील भाजपा नेत्यांना देखील अप्रत्यक्षपणे इशारा देण्यात आल्याचं बोललं जात आहे. “मोदी हाच भाजपाचा खरा चेहरा आहे. बाकी सारे फाटके मुखवटे आहेत. मोदींचा चेहरा नसेल, तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील. २०२४च्या तयारीसाठी त्यांनी साहसी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. तीन राज्यांचे मुख्यमंत्री बदलले. गुजरातमध्ये तर सगळी जमीन उकरून किडकी झाडं मुळापासून उपटून टाकली. हाच प्रयोग त्यांची सरकारं नसलेल्या प्रदेशांतही होऊ शकतो. मोदी है तो मुमकीन है म्हणायचं ते इथे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, अग्रलेखातून अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. “गेल्या काही महिन्यांत एक आसाम सोडले, तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालात तर अमित शाह यांनी जिवाची बाजी लावली. केरळात ई-श्रीधरनसारखा मोहरा कामी लावला होता. पण अमित शाह यांच्याच काळात महाराष्ट्रात २५ वर्ष जुन्या शिवसेना-भाजपा युतीचा तुकडा पडला आणि भाजपाला विरोधात बसावे लागले. पश्चिम बंगालातही कपाळमोक्ष झाला. जे. पी. नड्डांच्या माध्यमातून मोदींनी दुरुस्तीचे काम हाती घेतले असावे ते यामुळेच”, अशा शब्दांत शिवसेनेने मोदींचं कौतुक करतानाच भाजपावर देखील निशाणा साधला आहे.