नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दररोज नवे उच्चांक नोंदले जात आहे. गेल्या चोवीस तासांत देशात कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. २४ तासांत तब्बल २ लाख १७ हजार ३५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १ लाख १८ हजार ३०२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर १ हजार १८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून, गेल्या २४ तासांत देशात दोन लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील गेल्या २४ तासांतील कोरोना परिस्थितीची आकडेवारी जाहीर केली आहे. यात रुग्णासंख्या वाढीबरोबरच मृत्यूंची संख्या वाढत असल्याचंही समोर आलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत तब्बल २ लाख १७ हजार ३५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १ लाख १८ हजार ३०२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब म्हणजे देशातील मृतांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी एक हजारांच्या पुढे आहे. २४ तासांत भारतात १ हजार १८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७४ हजार ३०८ झाली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
महाराष्ट्रात गुरुवारी ६१,६९५ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ५३,३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३ टक्के एवढे आहे. राज्यात गुरुवारी ३४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर १.६३ टक्के एवढा आहे. राज्यात एकूण ६,२०,०६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.