वादानंतर चार तासातच अनैतिक संबंधातून तरुणाचा खून
जळगाव (प्रतिनिधी) महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या वादातून सागर साहेबराव सोनवणे (वय ३०, रा. निमखेडी, ता. जळगाव) याचे संशयितांसोबत सायंकाळी वाद झाला होता. या वादानंतर अवघ्या चार तासातच सागरच्या डोक्यात अवजड वस्तू मारुन त्याचा निघृण खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास निमखेडी गावात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात मध्यरात्री गुन्हा दाखल होताच तालुका पोलिसांनी तपाचक्रे फिरवित संशयित अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे व संदीप छगन बाविस्कर (दोघ रा. निमखेडी, ता. जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील निमखेडी येथे सागर सोनवणे हा आपल्या आई-वडील आणि भावासोबत वास्तव्याला होता.
गेल्या चार वर्षांपासून सागरचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याबाबत त्याच्या वडीलांना माहित पडल्यानंतर त्यांनी सागरला त्या महिलेचा नाद सोड, आपली गावात बदनामी होत असून त्यामुळे तुझे लग्न देखील जमत नसल्याने सांगितले. तसेच याच कारणामुळे त्यांच्या कुटुंबात अनेकदा वाद झाले होते. सागरच्या नातेवाईकांनी त्याला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही. दरम्यान, याच महिलेच्या कारणावरून अनेकदा मयत सागर सोनवणे आणि अनिल उर्फ शेट्टी नन्नवरे यांच्यात नेहमी वादविवाद होत होते. तसेच दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी सागर आणि संशयित मारेकरी अनिल उर्फ शेट्टी नन्नवरे व संदीप बाविस्कर यांच्यात वाद झाले होते. यावेळी त्या दोघांनी तु त्या बाईचा नाद सोडला नाही, तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देखील दिली होती.
तपासचक्रे फिरवित दोघ संशयितांना अटक
खूनाची घटना घडल्यानंतर सागरचा भाऊ विशाल सोनवणे यांनी रात्री तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे आणि संदीप छगन बाविस्कर यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपासचक्रे फिरवित मध्यरात्री दोघ संशयितांचा अटक केली आहे
धमकीनंतर काही तासात घडले हत्याकांड
सायंकाळच्या या धमकीनंतर काही तासांतच म्हणजे रात्री १० वाजण्याच्या दोघ संशयितांनी सागर सोनवणे याच्या डोक्यात अवजड वस्तू मारुन त्याचा निर्घण खून केला. गावातील राम मंदिर परिसरात सागर हा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेला होता. याबाबत सागरचे पाहुणे अनिल नन्नवरे यांना माहिती मिळताच त्यांनी लागलीच मित्रांच्या मदतीने सागरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. यावेळी सागरच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
दुपारी गावात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
खूनाची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सकाळी सागरच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. याठिकाणी नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुपारच्या सुमारास सागरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात सागरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी आक्रोश केला.
















