शहादा (प्रतिनिधी) ‘तिरंगा हा आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक आहे. तिरंगा आपल्या अनंत अनंत महान स्वातंत्र्य सेनानी़ंच्या बलिदानाची आठवण करून देतो. भारतभूमीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना मानाचा मुजरा करत भारत भूमीचे ऋण फेडण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याचे’ आवाहन सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग व मराठी विभागाच्या वतीने आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत ‘स्वातंत्र्य युद्धातील भारतीय क्रांतिकारक’ या विषयावर घेण्यात आलेल्या पोस्टर सादरीकरण स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव संजय जाधव बोलत होते. याप्रसंगी सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव वर्षाताई जाधव, राष्ट्र सेवा दल नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रा. आर. टी. पटेल, सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे समन्वयक संजय राजपूत सर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. ए. एन. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. डी. वाय. पाटील, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. एच. एस. पाटील मंचावर उपस्थित होते. प्रारंभी माता सरस्वती व भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
आपल्या मार्गदर्शनपर वक्तव्यात संजय जाधव म्हणाले की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झालीत आणि त्यामुळेच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा केला. सर्वांच्या प्रयत्नाने हा क्षण अजरामर झाला. आपल्या राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ‘घर घर तिरंगा, हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात आला. जन मनात देशभक्ती जागवणे या उपक्रमाचा मुख्य हेतू होता, तो साध्य झाल्याचे खूप समाधान आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे कर्तव्य प्रेरणेच्या, देश प्रेमाच्या व स्वावलंबनाच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे आश्वासक पाऊल आहे. याने तयार झालेली पाऊलवाट समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी फार महत्त्वाची ठरणार आहे. आज आपला देश विकासाच्या उत्तुंग पातळीवर पोहोचला आहे. या विकासगंगेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींना आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा. या महान बलिदानींचे पावन स्मरण करून आपला देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे. चला तर मग, या अमृत महोत्सवानिमित्त आपण भारताचा अभिमान संपूर्ण जगासमोर ठेवूया. असे सांगत त्यांनी विद्यार्थी स्पर्धकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रमुख अतिथी व सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव मा. सौ. वर्षाताईसाहेब जाधव प्राध्यापकांचे अभिनंदन करत म्हणाल्या की इतिहासाचा धांडोळा हा भविष्याचा मार्ग प्रशस्त करतो. आपल्या अत्यंत गौरवशाली इतिहासाचे स्मरण आपल्याला असलेच पाहिजे. ही पावन भारतभूमी, या भूमीवर वसणारे लोक व त्यांची संस्कृती हे सर्व मिळून देश तयार होतो. महान स्वातंत्र्य सेनानींची पोस्टर्स रेखाटतांना सर्वच स्पर्धक विद्यार्थ्यांना एक दिव्य अनुभूती झाली असेल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात महात्मा गांधीजींच्या साबरमती आश्रमापासून करण्यात आली. यामुळे अधिक प्रखरपणे देशभक्ती जागृत झाली. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढा देणाऱ्या वीर हुतात्म्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्यात. पण त्यांनी न डगमगता देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले. आपण स्वातंत्र्य काळात जन्मलो. म्हणून आपल्या साठी हे स्वातंत्र्य, देशाची एकता, परस्पर सामंजस्य, सहकार्याची भावना टिकविणे फार महत्त्वाचे आहे. यातूनच स्वावलंबनाच्या दिशेने पडणाऱ्या आपल्या पावलांनी स्वप्नातील भारत घडविण्याच्या संकल्पनांना बळ मिळेल. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा पवित्र उत्सव आहे. देशभक्तीचा गौरव आहे. आज बघता बघता या स्वातंत्र्याचा प्रवास 75 वर्षांच्या होत आहे. सर्व स्पर्धकांचे अभिनंदन व कौतुक करून त्यांनी राष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगत देशाच्या विकासात तरूणांनी योगदान देण्याचे आवाहन केले.
या स्पर्धेचे उद्घाटक व राष्ट्र सेवा दल नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष आर. टी. पटेल म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास अत्यंत जाज्वल्य आहे. स्वातंत्र्यासाठी लढा उभारणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींना सारा देश मानाचा मुजरा करत आहे. सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत स्वातंत्र्य युद्धातील भारतीय क्रांतिकारक या विषयावरील सादर केलेली पोस्टर्स अत्यंत कौतुकास्पद आहेत. आपण केलेल्या या प्रामाणिक प्रयत्नांचे मी मनापासून अभिनंदन करतो. असे सांगत त्यांनी सर्व प्राध्यापकांचेही अभिनंदन करून शहादे शहरातील स्वातंत्र्य सेनानींचा जीवनपट उलगडून सांगितला.
प्रमुख अतिथी व सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे समन्वयक संजय राजपूत सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, या मातृभूमीचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. ते फेडण्याचे आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपण सादर केलेल्या पोस्टर्स मधून इतिहासाला नवा उजाळा मिळाला. भारताच्या इतिहास जाणून घेत असतांना आपण आपल्या परिसरातील इतिहासाचाही धांडोळा घेतला पाहिजे. याने आपण खऱ्या अर्थाने भारताच्या इतिहासाशी परिचित होऊ शकतो. शहादे शहरातील शहीद लालदास चौकात दरवर्षी 14 ऑगस्ट च्या मध्यरात्री ध्वजारोहण होते. हा रोमांचक प्रसंग आपण सर्वांनी अनुभवला पाहिजे. सोबतच स्वातंत्र्य चळवळीतील शहादा व परिसरातील योगदानाचा अभ्यास आपण केला पाहिजे. आपण केलेल्या रेखाटनाने इतिहास जिवंत झाला. आपल्यासाठी जगत असतांना देशासाठीही जगण्याच्या विचार- संस्कार जोपासण्याचे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या पोस्टर स्पर्धेत 52 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. ए. एन. पाटील म्हणाले की हे चित्र प्रदर्शन पाहून इतिहासाची नव्याने उजळणी झाली. मित्रांनो, स्वातंत्र्याचा अर्थ आणि आवाका फार मोठा आहे. आपल्याला आपल्या पूर्वजांनी अत्यंत मेहनतीने स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. ते टिकवून ठेवणे फार महत्त्वाचे आहे. सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कर्मसाक्षी स्व. नानासाहेब जाधव यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती केली. त्यांचे चरित्र येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत प्रेरक व मार्गदर्शक आहे. आपण ज्या विद्यार्थी दशेत आहात तिथे महान लोकांच्या चरित्रांचे वाचन झाले पाहिजे. जेणेकरून आपल्या जीवनाची जडणघडण सर्वार्थाने घडत जाईल. प्राध्यापकांनी घडवून आणलेल्या या सुंदर कार्यक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले. प्रत्येकाने आपल्यातील क्रांतीत्वाची ज्योत विकसित करत देशाची सेवा करण्याचे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. एच. एस. पाटील, प्रस्तावना विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. डी. वाय. पाटील यांनी तर प्रा. अश्विनी पाटील यांनी आभार प्रकटन केले. मराठी विभागाचे प्रा. डॉ. आर. डी. पाटील, विद्यार्थी विकास सहाय्यक अधिकारी प्रा. जी. एस. पाटील, विद्यार्थी विकास सहाय्यक महिला अधिकारी प्रा. मालिनी अढाव यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधूंनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.