नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय नौदलाला गस्तीसाठी आवश्यक असलेली जहाजे नियोजित वेळेत तयार करून न दिल्यामुळे संरक्षण मंत्रालयाकडून अनिल धीरुभाई अंबानी समूहाला (ADAG) देण्यात आलेले २५०० कोटींचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे.
नौदलाला गस्तीसाठीची पाच जहाजे पुरवण्यासाठी रिलायन्स आणि नौदलामध्ये २०११ साली करार झाला होता. यानंतर रिलायन्सकडून गुजरातमधील जहाज बांधणीचा कारखाना खरेदी करण्यात आला. परंतु, यानंतर रिलायन्सला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. रिलायन्स नेवल अँण्ड इंजीनियरिंग लिमिटेडला (आरएनईएल) हे कंत्राट देण्यात आले होते. ‘आरएनईएल’ला नियोजित वेळेत ही जहाजे देता आली नाहीत. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने आरएनईएल कंपनीचे कंत्राटच रद्द केले. दरम्यान, कर्जाच्या बोझ्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी यांना यानिमित्ताने आणखी एक मोठा झटका बसला आहे.