मुंबई (वृत्तसंस्था) ‘शिवसेनेचा लाऊडस्पीकर मागील ५६ वर्षांपासून सुरू आहे. हा लाऊडस्पीकर म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांच्या पिपाण्या राज्यातील जनतेनं बंद करून टाकल्या आहेत,’ अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच हे चोऱ्यामाऱ्या करून आलेलं सरकार, कितीही पिपाण्या वाजवा अंतर्गत कलहानेच पडेल,असा दावा देखील राऊतांनी केला आहे.
संजय राऊत यांच्या दरदरोज होणाऱ्या पत्रकार परिषदांना महाराष्ट्रातील लोक कंटाळले होते, असं म्हणत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेला आता राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शिवसेनेचा लाऊडस्पीकर मागील ५६ वर्षांपासून सुरू आहे. हा लाऊडस्पीकर म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांच्या पिपाण्या राज्यातील जनतेनं बंद करून टाकल्या आहेत,’ अशा शब्दांत राऊत यांनी पलटवार केला. तसेच गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. आदित्य ठाकरे यांना ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. काल आदित्य ठाकरे वैजापूर, पैठणला होते. त्यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. माणसांच्या तरुणांच्या रुपात नाथसागरच जणू रस्त्यावर उतरल्याचं चित्रं होतं. त्यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. पण हे चित्रं आगामी काळातही दिसेल, असं राऊत यांनी सांगितलं. राऊत म्हणाले, भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. मनमोकळेपणाने मत व्यक्त करता येत नाही पण चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन करतो की, त्यांनी खरे वक्तव्य केले. पोटात मळमळत होते ते ओठावर आले, पण नंतर त्यांनाच खुलासा करावा लागला की ही भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.