नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लग्नासाठी इतर धर्मांमध्ये धर्मांतर करणारे हिंदू मोठी चूक करत असल्याचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. धर्मांतरण कसे होते? हिंदू मुली आणि मुले क्षुल्लक स्वार्थासाठी, लग्नासाठी इतर धर्म स्वीकारतात. हे चुकीचे आहे, असं भागवत यांनी रविवारी उत्तराखंडमधील हल्दवानी येथे एका कार्यक्रमात संघ कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांना संबोधित करताना बोलत होते.
हिंदू मुली, मुले क्षुल्लक स्वार्थासाठी, लग्नासाठी इतर धर्म स्वीकारतात
“धर्मांतरण कसे होते? हिंदू मुली आणि मुले क्षुल्लक स्वार्थासाठी, लग्नासाठी इतर धर्म स्वीकारतात. हे चुकीचे आहे. तरुणांनी आपल्या धर्माबद्दल आणि परंपरेबद्दल आदर बाळगण्याची गरज आहे. आपण आपल्या मुलांना तयार केले पाहिजे आणि त्यासाठी आपण शिकले पाहिजे. आपण त्यांना मुल्ये देण्याची गरज आहे, असे भागवत म्हणाले. तसेच भागवत यांनी नमूद केले की, भारतीय संस्कृतीच्या मुळांशी जोडलेले राहण्यासाठी सहा ‘मंत्र’ आहेत. ज्यात भाषा, भोजन, भक्तीगीते, प्रवास, ड्रेस आणि घर यांचा समावेश आहे. त्यांनी लोकांना पारंपारिक रीतिरिवाजांचे पालन करण्याचे आवाहन केले.
जेव्हा हिंदू जागृत होतील, तेव्हा जग जागृत होईल
तसेच अस्पृश्यता सारख्या नापाक रूढींचा त्याग केला पाहिजे, असे त्यांनी म्ह्टलं. जातीच्या आधारावर भेद करू नका. अस्पृश्यता नसावी. समाजाला नावांवरून धर्माचा अंदाज लावण्याची सवय आहे. लोकांचा भेद पूर्णपणे अंतःकरणातून काढून टाकला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच पर्यावरणीय समस्यांवर चर्चा करण्यास त्यांनी सांगितले. तर “जेव्हा हिंदू जागृत होतील, तेव्हा जग जागृत होईल,” असे सरसंघचालक म्हणाले.
प्रत्येकाने एकत्र राहणे आवश्यक
समाज कुटुंबाच्या आधारावर चालतो. प्रत्येकाने एकमेकांचे अवलंबन स्वीकारले तर समाज व्यवस्थित चालेल. जसे संपूर्ण भारत एक कुटुंब आहे. त्याचप्रमाणे आपण सर्वजण या भारतमातेचे कुटुंब आहोत. प्रत्येकाने एकत्र राहणे आवश्यक आहे. गाय जशी आपली मातता आहे. तशीच ब्रह्मांड सुद्धा आपली माता आहे. आपल्याला संपूर्ण मानवतेने जगावे लागेल. माणुसकी जपणे हा कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि आपले कुटुंब स्वार्थाने बांधलेले नाही, असे भागवत म्हणाले. संपूर्ण भारतात ८०० विविध प्रकारचे अन्न तयार केले जाते. हे पोषणाने परिपूर्ण आहेत. उत्तराखंडमध्ये देखील अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत. जे खूप चवदार आहेत. लोकांना बाहेरचे खाणे टाळावे आणि कुटुंबासह घरी सोबत जेवणे आवश्यक आहे, असे भागवत म्हणाले.
तरुण पिढी अमली पदार्थांमुळे उद्ध्वस्त होत आहे
तुम्ही जेवढा प्रवास कराल तेवढे तुम्हाला ज्ञान मिळेल. तुम्ही परदेशातही जाऊ शकता. पण भारतातील तीर्थक्षेत्राच्या धार्मिक स्थळालाही भेट द्या. जेणेकरून तुम्हालाही त्यांच्याबद्दल माहिती मिळेल. आज तरुण पिढी अमली पदार्थांमुळे उद्ध्वस्त होत आहे. नैनीताल आणि डेहराडून जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या व्यसनाचा प्रादुर्भाव पसरला आहे. हे संपवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एक जनजागृती मोहीम राबवण्याची गरज आहे, जेणेकरून नशा पूर्णपणे थांबवता येईल, असे भागवत यांनी नमूद केले.
















