जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन प्लांट आणि व्हेंटिलेटर खरेदीत कोट्यांवधीचा घोटाळा झाल्याची तक्रार सामजिक कार्यकर्ते दिनेश भोळेंनी केली होती. याप्रकरणी त्रयस्त चौकशी समिती नेमून चौकशी करण्याची मागणी आज विधानसभेत शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील यांनी केली.
आमदार चिमणराव पाटील यांनी सभागृहात म्हटले की, मला या ठिकाणी खेदाने नमूद करावंसं वाटतं की, जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या नावाखाली जि खरेदी झाली, जी कामं झाली ती अत्यंत निकृष्ट प्रतीची झाली. ऑक्सीजन प्लांट करण्याचा संकल्प करण्यात आला होता. परंतु एकही ऑक्सीजन प्लांट कार्यरत नाही. एक लिटर ऑक्सीजनही कुणाला मिळू शकत नाहीय, अशा प्रकारची अवस्था जिल्ह्यात आहे. कोरोना काळात ज्या-ज्या गोष्टी घेण्यात आल्या होत्या. त्यात थर्मामीटर, पीपीई कीट आणि व्हेंटिलेटरसह इतर गोष्टींचा समावेश होता. व्हेंटिलेटरच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी, सिव्हील सर्जन यांना आम्ही नियोजन मंडळाच्या बैठकीत तक्रारी दिल्या. ज्या कंपनीचे व्हेंटिलेटर आपण मागविले होते, त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे व्हेंटिलेटर आलेले नाहीत. आणि तरीसुद्धा व्हेंटिलेटर स्वीकारण्यात आले. अगदी तक्रार झाली तेव्हा ते व्हेंटिलेटर त्यांनी परत केले. यात गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न झालाय. त्यामुळे डीपीडीसी आणि आरोग्य विभागामार्फत झालेल्या कामाची त्रयस्त एजन्सी किंवा ऑडीटर यांच्यामाध्यमातून चौकशी करण्यात यावी. कारण आज लोकप्रतिनिधींच्या बाबतीत आज जनतेच्या मनात गैरसमज निर्माण झालाय की, यांनी या ठिकाणी काही तरी गैरव्यवहार केलाय. जनतेचा हा गैरसमज जर दूर करायचा असेल तर आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असेही आमदार चिमणराव पाटील म्हणाले.
शिवसेनेची सभागृहात दुसऱ्यांदा मागणी
जळगावातील कथित व्हेंटिलेटर खरेदी घोटाळ्याच्या बाबतीत याआधी शिवसेनेचे पदवीधर मतदार संघाचे आमदार विलास पोतनीस यांनी मागील अधिवेशनात विधान परिषदमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. (१) जळगाव जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नियंत्रणाखाली ३० व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय?. (२) असल्यास सदर खरेदी प्रक्रिये प्रकरणी चौकशी करण्यासाठी शासनाने समिती नेमली आहे काय?. (३) असल्यास समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय, सदरहू अहवालात कोणत्या शिफारसी करण्यात आल्या आहेत आणि तद्नुषंगाने दर्जाहीन व्हेंटिलेटर पुरवून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित कंपनीवर आणि दोषी अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे. (४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?, असे प्रश्न उपस्थीत केले होते. त्यानंतर आज शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील यांनी त्रयस्त एजन्सी किंवा ऑडीटर यांच्यामाध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
चौकशी समितीत एकही तज्ज्ञ नसल्याचा आरोप
तक्रारीनंतर नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीत समाविष्ठ लोकांमध्ये एकही तज्ज्ञ नाहीत. जिल्हा शल्य चिकित्सकांवर आरोप झाल्यानंतर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे केवळ चौकशीचा फार्स असून, चौकशीच चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप तक्रारदार दिनेश भोळे यांनी होता. तसेच चौकशीच्या आधी आरोप असणाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी शिवराम पाटील यांनी केली होती.
भोळेनी पोलिसात नोंदावली ऑनलाईन तक्रार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर नसल्याने शेकडो नागरिकांचे बळी गेले होते. यामुळे राज्यात सरकारने व्हेंटिलेटर अभावी कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी व्हेंटिलेटर खरेदी करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला देण्यात आले होते. पण या अधिकारांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप सामजिक कार्यकर्ते दिनेश भोळेंनी करत घोटाळा उघडकीस आणला होता. तसेच दिनेश भोळेंनी बुधवारी पोलिसांच्या सीसीटीएनएसला ऑनलाईन तक्रार नोंदवली होती. तसेच याची एक प्रत पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा पेठ पोलीस स्थानकात दिली आहे.