जळगाव (प्रतिनिधी) हाथरस येथील दलित तरुणीची अत्याचारानंतर करण्यात आलेली हत्या आणि राहुल गांधींना युपी पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध करण्यात आला. तसेच उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करावी, अशी मागणी आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील एका दलित युवतीवर काही नराधमांनी अत्याचार केला. त्यात तिचा जिव गेला. त्यानंतर प्रशासनाने तिच्या परिवारास तिला भेटू दिले नाही. तिच्या पार्थीवाचे अंतिम दर्शन घेऊ दिले नाही, विधी करू दिला नाही. तसेच परिवारासह संपूर्ण गावाला बंदी बनवून ठेवत मध्यरात्रीनंतर पोलिसांनी तिचे पार्थीव दहन केले. पिडीतेच्या परिवारास भेटायला गावातील लोकांना बंदी घातली. एवढेच नव्हे तर पिडीतेच्या परिवारास भेटायला गेलेले कॉंग्रेस नेते खा.राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा व इतर खासदार, लोकप्रतीनिधींना, सामान्य जनतेला तेथील स्थानीक पोलिसांनी मारहाण व धक्काबुक्की केली. तसेच मिडियाला देखील गावात जाऊ दिले नाही. वरील बाबी ह्या गंभीर असून भारतात लोकशाही आहे की हुकूमशाही? असा प्रश्न निर्माण करणारी आहे. राहुलजी गांधी, प्रियंका गांधी यांच्या पुर्वजांनी मा. पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान राजीव गांधी या सर्वांनी देशाच्या प्रगतीसाठी संपूर्ण जिवन योगदान दिले. राहुल गांधी, प्रियंका गांधी हे दोघेही जनसेवा करीत आहे. मा. खा. डेरेक ओब्रायन व मा. खा. ममता ठाकूर अशा बड्या नेत्यांना, खासदारांना, मिडीला जर पोलीस मारहाण करत असतील तर सामान्य जनतेचे काय होईल? असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. तसेच वरील बाब पाहता तेथील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. भाजपाने रामराज्य आणण्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात तेथील सरकार पोलिसांमार्फत सामान्य जनतेवर अन्याय करीत आहे. वरील सर्व घटनांचा आम्ही निषेध करतो, व उत्तर प्रदेश सरकार बरखास्त व्हावे ही मागणी करतो, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,रवींद्र पाटील कल्पना पाटील, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मंगला पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन, मीडिया प्रमुख सलीम इनामदार, अरविंद मानकरी, संजय चौहान, बंडू भोळे, संदीप पाटील, ललित बागुल, जयश्री पाटील, मनीषाताई, अकिल पटेल, अनिरुद्ध जाधव, अॅड.राजेश गोयर, चंद्रकांत चौधरी. मीनाक्षी चौहान व इतर अनेक मान्यवर नेते उपस्तिथ होते. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधातही घोषणाबाजी देखील करण्यात आली.