नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील किमान १.६ कोटी लोकांना त्यांच्या कोरोना लसीच्या पहिल्या डोसच्या १६ आठवड्यांनंतरही लसीचा दुसरा डोस अद्याप मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त वृद्ध आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोना लसीचे ५८.८२ कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यामधील पहिला डोस घेतलेल्या किमान १.६ कोटी लोकांना १६ आठवड्यांच्या आत दुसरा डोस मिळाला नसल्याचं समोर आलं आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या एक कोटीहून अधिक आहे. उरलेल्या नागरिकांमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या जास्त आहे.
१८-४४ वयोगटातील लोकांसाठी, लसीकरण १ मे पासून सुरु करण्यात आले होते. या वयोगटातील ८६,००० हून अधिक लोकांना २ मे रोजी पहिला डोस मिळाला. सोमवारपर्यंत त्यापैकी १.९४ कोटींपेक्षा जास्त लोकांना त्यांचा दुसरा डोस मिळाला आहे. १८ पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकसंख्येपैकी, ४८ टक्के लोकांना कमीतकमी एक डोस मिळाला आहे, पण केवळ १४ टक्के लोकांना दोन्ही मिळाले आहेत.
या दरम्यान, केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डींनी सांगितलं की, देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये गती आणण्यासाठी केंद्र सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. कोरोना लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार परदेशातून जास्तीत जास्त कच्चा माल उपलब्ध करुन देण्यावर भर देत आहे.