नाशिक (वृत्तसंस्था) राज्यासमोर कोरोनाचे संकट असताना नाशिकमधून आणखी एक चिंतेची बाब समोर येत आहे. चक्कर येऊन रुग्ण दगावण्याच्या घटना नाशिकमध्ये पुन्हा समोर आल्या आहेत. नाशिकमध्ये एकाच दिवसात ११ जणांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या ११ जणांना चक्कर आल्याने जीव गमवावा लागला आहे.
भोवळ येऊन नाशकात वेगवेगळ्या घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून अशाप्रकारे चक्कर येऊन मृत्यू होत असल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. वाढत्या कोरोना संसर्गाला तोंड देत असताना नाशकात नवं संकट उभं राहिलं आहे. अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचा आकडा एका दिवसात ११ वर गेला आहे. गेल्या आठवड्यात १३ जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाला होता. १५ एप्रिल रोजी एका दिवसात ९ जणांना चक्कर येऊन प्राण गमवावे लागले होते, तर त्याआधी चौघे मृत्युमुखी पडले होते. म्हणजेच दोन आठवड्यात २४ जणांनी चक्कर आल्याने जीव गमावले. विशेष म्हणजे मृतांमध्ये तरुणांचाही समावेश आहे. याआधी कोणाचा रस्त्याने पायी जाताना मृत्यू झाला होता, तर कोणाला राहत्या घरीच चक्कर आली होती.
गेल्या काही दिवसात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला आहे. नाशिक शहराचं तापमान वाढून ४० अंशाच्या पार पोहोचलं आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊन मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज याआधीही वर्तवण्यात आला होता. परंतु मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चक्कर येऊन पडल्याने १० एप्रिलला नाशिकमध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. इंदिरानगर, उपनगर, श्रमिकनगर आणि देवळाली गावात या घटना घडल्या होत्या. तर १५ एप्रिल रोजी एका दिवसात ९ जणांना चक्कर येऊन प्राण गमवावे लागले होते. या प्रकरणी संबधित पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.