धरणगाव (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात होऊ घातल्या आहेत. तर लोकसभा, विधानसभा देखील जवळ येऊन ठेपली आहे. अशा स्थितीत मात्र, मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेदांमुळे गटबाजी देखील वाढली आहे. त्यामुळे तालुक्यात गळती आणि गटबाजी रोखण्याचं मोठं आव्हान राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वा समोर उभं ठाकलं आहे.
धरणगाव शहरसह ग्रामीण भागातील अनेक राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचे शिवसेना (शिंदे गट) प्रवेश सुरु आहेत. रविवारी कवठळ येथील अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वास्तविक बघता कवठळ गावात राष्ट्रवादीची चांगल्यापैकी वोट बँक स्थिर होती. परंतू गावातील अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तालुक्यात एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
नेमकं चुकते कुठंय, राष्ट्रवादीला शोध घेण्याची गरज !
याआधी देखील भामर्डी, वावडदा आणि शिरसोली, चिंचपूरा, पिंप्री येथील सभेतही अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना या गळतीची कारणं आता शोधावी लागणार आहेत. शिवसेने विरोधात राज्यभर रान पेटविण्यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी बऱ्यापैकी यशस्वी झाली आहे. परंतू दुसरीकडे जळगाव ग्रामीण मतदार संघात मात्र, गुलाबराव पाटील यांच्यासोबत जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नेमकं चुकते कुठं आहे?, याचा शोध घेतला नाही तर याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला पर्यायी राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला बसण्याची शक्यता नाकारता येत आहे.
कृउबा निवडणुकीतही उफाळली गटबाजी !
सध्या कृषी बाजार उत्पन्न समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. जिल्हा बँक, दुध फेडरेशन प्रमाणे या निवडणुकी दरम्यानही राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळून आली आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी पालकमंत्र्याच्या पॅनलसोबत आघाडी केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे. तर धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन हे देखील या निवडणुकीत फारसे सक्रीय दिसत नाहीय. त्यामुळे धरणगाव कृषी बाजार उत्पन्न समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील एक प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रावादीचे दोन गट एकमेका विरोधात उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे राष्ट्रवादीचा मतदार संभ्रमित झालाय की, नेमकी कोणत्या राष्ट्रवादीच्या पॅनलला मतदान करायचे?.
‘डॅमेज कंट्रोल’ तूर्त तरी सहज आणि अपोआप !
दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदार संघात वेगवेगळ्या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून विविध विकासकामांचे भूमिपूजनासह सभांचा धडाका सुरु केला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक सभेत ५-२५ कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. वास्तविक बघता शिवसेनेत दोन गट पडल्यापासून गुलाबराव पाटील यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते. परंतू पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आतापासूनच मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. तशात इतर पक्षातील खास करून राष्ट्रवादीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे ना. पाटील यांना जे डॅमेज कंट्रोल करायचे होते, ते तूर्त तरी सहज आणि अपोआप होत असल्याचे चित्र आहे. थोडक्यात निवडणुकीच्या अॅक्शनमोड असलेल्या गुलाबराव पाटील यांच्यासाठी ही दिलासा देणारी बाब आहे. तर दुसरीकडे मात्र, राष्ट्रवादीसह इतर पक्षात कमालीची शांतता दिसत आहे आणि हीच त्यांच्यासाठी नेमकी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.
संभाव्य पक्षांतरामुळे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता !
धरणगाव तालुक्यातील आणखी काही पदाधिकारी पक्षांतर करणार असल्याची जोरदार आतापासून चर्चा सुरु आहे. मात्र, कोणत्या पक्षातील कोणते पदाधिकारी आणि कोणत्या पक्षात जातील, हे अद्याप स्पष्ट नसले तरी जे पदाधिकारी जातील, त्यांचा मतदार संघातील राजकीय घडामोडींवर मोठा प्रभाव पडेल असे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होईल, अशी देखील चर्चा आहे. या पक्षांतरांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघेल तसेच मोठा राजकीय स्फोट देखील होईल, अशी देखील चर्चा आहे. पण हे पक्षांतर महाविकास आघाडी की महायुती नेमकं कुणाच्या पथ्यावर पडतं?, हे तर आगामी काळातच स्पष्ट होईल.