नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांवर वेळीच उपचार होत नसल्याने वाढत असलेला मृत्यूचा आकडा आणि विविध नियमांवर बोट ठेवत दाखल करून घेण्यास रुग्णालयांकडून दिला जाणार नकार, यापार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कठोर पावलं उचलली आहे. यापुढे रुग्णालयात भरती करण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टची गरज लागणार नाही. या निर्णयामुळे कोरोना संशयित रुग्णांवर वेळेतच उपचार सुरु होतील.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोना रुग्णांना कोविड सुविधांमध्ये दाखल करण्यासाठी राष्ट्रीय धोरणात बदल करण्यात आला आहे. मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, “कोरोनाचे संशयास्पद प्रकरण आढळल्यास त्याला सीसीसी, डीसीएचसी किंवा डीएचसी वॉर्डमध्ये दाखल केले जाईल. कोणत्याही रुग्णाला सेवेस नकार दिला जाऊ शकत नाही. यामध्ये ऑक्सिजन किंवा आवश्यक औषधे देखील समाविष्ट आहेत, जरी रुग्ण दुसर्या शहराचा असला तरी त्याला उपचार नाकारले जाणार नाहीत”
सध्या देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना संशयित रुग्णांची कोरोना चाचणी अहवाल येण्यासाठी दोन ते आठ दिवसांचा कालावधी लागत आहे. अशात रुग्णांकडे रिपोर्ट नसल्याने रुग्णालयात भरती करुन घेत नव्हते. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे आता अनेकांना दिलासा मिळाला आहे.
४ हजार रुग्णांचा मृत्यू
देशात एका दिवसात कोरोनाच्या ४,१८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची संख्या २,३८,२७० वर गेली आहे. तर देशात एका दिवसात ४,०१,०७८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या २,१८,९२,६७६ झाली आहे.