भुसावळ (प्रतिनिधी) मागील १० वर्षांपासून आजारपण आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून बामणोद (ता. यावल) येथील शेतकरी दाम्पत्याने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीय. वसंत वासुदेव नेमाडे (वय ६३), मालतीबाई वसंत नेमाडे (वय ५५) अशी दोघांची नावे आहेत.
सोमवारी भुसावळ येथील तापीच्या पुलावर दुचाकी बेवारस स्थितीत अाढळून आली. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. नेमाडे दापत्य रविवारी दुपारी बामणोद येथील राहत्या घरापासून दुचाकीने बाहेर पडले होते. सोमवारी (दि. २९) सकाळी तापी नदीपात्रात बेवारस दुचाकी उभी असल्याची माहिती भुसावळ शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार दुचाकीची पाहणी केल्यानंतर भुसावळ शहरातील तापी पात्रातील राहुलनगर घाटाजवळ दोघांचे मृतदेह तरंगताना दिसून आलेत.
स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने हे मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. पोलिसांनी केलेल्या तपासात दोन्ही मृतदेह बामणोद येथील दाम्पत्याचे असल्याचे स्पष्ट झाले. मालतीबाई या गेल्या १० वर्षांपासून आजारी होत्या. घरची परिस्थिती बेताची असून, या परिवाराने आपली शेती निम्मे हिश्श्याने कसण्यासाठी दिली आहे. तसेच मुलगा आणि सून हे दोन्हीही डॉ. उल्हास पाटील महाविद्यालय व रुग्णालयात रोजंदारीवर काम करतात. शिवाय वसंत नेमाडे यांच्याकडूनही वृद्धापकाळामुळे काम होत नव्हते. परिणामी, त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. अशा परिस्थितीला कंटाळून या दाम्पत्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.